मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा बंद

| Updated on: Aug 25, 2019 | 8:41 AM

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरातून जाणार असल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर ही यात्रा शहराबाहेर गेल्यानंतर काही तासात वीज पुरवठा सुरु करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा मलकापूरकरांना नाहक त्रास, 5 तास वीज पुरवठा बंद
Follow us on

जळगाव : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. मात्र भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मलकापुरातील नागरिकांना भाजपाचीच महाजनादेश यात्रा ही डोकेदुखी म्हणून ठरली आहे. दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा काल जळगावच्या मलकापूर ठिकाणी होती. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहरातून जाणार असल्याने शहरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यानंतर ही यात्रा शहराबाहेर गेल्यानंतर काही तासात वीज पुरवठा सुरु करण्यात आला.

महाजनादेश यात्रेमुळे खंडीत केलेला वीज पुरवठा तब्बल पाच ते सात तास बंद असल्याने याचा नाहक त्रास शहरातील नागरिकांसह व्यावसायिकांना सहन करावा लागला.

जनादेश यात्रेतील पहिल्या टप्प्यात 3 ऑगस्टला भंडारा जिल्ह्यात महाजनादेश यात्रमध्ये अभिवादन करताना मुख्यमंत्र्यांना विजेच्या तारांचा स्पर्श होणार होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनीं सतर्कता दाखवत वेळीच खाली वाकल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात मलकापूरपासून 5 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावरील सर्व विजेचे तार मलकापूर वीज वितरण महामंडळाने काढून टाकले होते. त्यामुळे या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे मलकापूरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दुपारी 2 वाजताच्या सुमारास दाखल झाली, मात्र माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचं निधन झाल्याने ही महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आलीय. केवळ अर्ध्या तासातच ही यात्रा आटपती घेण्यात आली. ही यात्रा पुढे गेल्यानंतर रस्त्यावरचे काढलेले विजेचे तार पुन्हा जोडून दोन तासांच्या फरकाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

एकीकडे म्हजनादेशाच्या नावाखाली आपण केलेली कामे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे नागरिकांना समाधान होण्याऐवजी यात्रेत अडसर ठरणाऱ्या विजेचे तारा कापून वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे ठिकाणाचा वीज पुरवठा तब्बल 5 ते 6 तास बंद राहतो. याचा नाहक फटका शहरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

दरम्यान याप्रकरणी नाराजी व्यक्त करत शहरातील ऍड.अनंतकुमार शर्मा यांनी वीज वितरण महामंडळाच्या विरोधात मलकापूर शहर पोलिसात ऑनलाइन तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.