राहुल गांधींचा राजकीय विजनवास संपला, महाराष्ट्रातून दौऱ्याची सुरुवात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या समारोपानिमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी राहुल गांधींची (Rahul Gandhi wardha) उपस्थिती असेल.

राहुल गांधींचा राजकीय विजनवास संपला, महाराष्ट्रातून दौऱ्याची सुरुवात
| Edited By: | Updated on: Sep 26, 2019 | 4:57 PM

वर्धा : राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, बालेकिल्ला असलेल्या अमेठी मतदारसंघातून झालेला पराभव जिव्हारी लागलेले राहुल गांधी या निवडणुकीपासून विजनवासात गेले. पण हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी (Rahul Gandhi wardha) पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या समारोपानिमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी राहुल गांधींची (Rahul Gandhi wardha) उपस्थिती असेल.

पदयात्रेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित असतील.

वर्ध्यातील ही पदयात्रा सकाळी 2 ऑक्टोबरला सकाळी बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरु होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या पदयात्रेला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवारांपर्यंत दिग्गज नेते महाराष्ट्रात सभा घेत आहेत. पण काँग्रेसचा एकही मोठा अजून सक्रिय झालेला नाही. अनेक जागांवर काँग्रेसची अजून चर्चा सुरु आहे. पण 2 ऑक्टोबरपासून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत.