ते स्वत: रामायणाचे..; रहमान यांच्या भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक स्पष्टच म्हणाला..
ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिक भेदभावाच्या वक्तव्यावर प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सलीमने 'रामायण' या चित्रपटाचं उदाहरण दिलं. रहमान यांनी गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याचं म्हटलं होतं.

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रहमान यांच्या एका वक्तव्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत आणि सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत रहमान यांनी गेल्या 8 वर्षांपासून काम न मिळाल्याची तक्रार बोलून दाखवली. इतकंच नव्हे तर याला सांप्रदायिक भेदभाव कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. रहमान यांच्या या वक्तव्यानंतर दोन गटांमध्ये मतं नोंदवली जाऊ लागली. फिल्म इंडस्ट्रीत सांप्रदायिक भेदभाव होत नसल्याचं काहींनी म्हटलं होतं. त्यानंतर आता प्रसिद्ध गायक सलीम मर्चंटने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सलीम म्हणाला, “मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. परंतु मला वैयक्तिक असं वाटत नाही की अशा परिस्थितीत सांप्रदायिक भेदभावाची काही भूमिका असेल. ए. आर. रहमान यांचे इंडस्ट्रीत काही वेगळे अनुभव असतील, पण माझं मत हे माझ्या वैयक्तिक दृष्टीकोनावर आधारित आहे. संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला एकाच नजरेतून पाहणं योग्य नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्याशी प्रत्येक व्यक्ती सहमत असेलच असं नाही.”
यावेळी सलीम मर्चंटने रहमान यांच्या आगामी प्रोजेक्टचं उदाहरण दिलं. “जर ए. आर. रहमान यांना भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत मोठा चित्रपट मानल्या जाणाऱ्या ‘रामायणा’तील गीत संगीतबद्ध करण्याची संधी मिळत असेल तर त्यांच्यासोबत सांप्रदायिक भेदभाव होत आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. ‘रामायण’ हा एका हिंदू पौराणिक कथेवर आधारित प्रोजेक्ट आहे. यावरून हे समजतंय की इंडस्ट्री रहमान यांच्या प्रतिभेला त्यांच्या धार्मिक ओळखीपेक्षा जास्त महत्त्व देते. परंतु हे माझं वैयक्तिक मत आहे, त्यांची काही वेगळी कारणं असू शकतात”, असं तो पुढे म्हणाला.
रहमान यांनी मुलाखतीत फिल्म इंडस्ट्री आणि ‘छावा’ या चित्रपटाबद्दल आपली मतं बिनधास्तपणे मांडली होती. परंतु त्यावरून त्यांना प्रचंड टीकेचा सामनाही करावा लागला होता. हा वाद वाढत असल्याचं पाहून त्यांनी माफी मागत स्पष्टीकरणसुद्धा दिलं होतं. इतकंच नव्हे तर रहमान यांची मुलंसुद्धा त्यांच्या समर्थनार्थ टीकाकारांना सडेतोड उत्तर देत होती. ‘लोकांकडे भगवदगीता, कुराण आणि बायबल वाचायला वेळ नाही, पण एकमेकांशी भांडायला, इतरांची खिल्ली उडवायला, भडकवायला, शिवीगाळ करायला खूप वेळ आहे’, अशा शब्दांत रहमान यांची मुलगी रहीमाने ट्रोलर्सना सुनावलं होतं.
रहमान यांनी एका मुलाखतीत विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला फूट पाडणारा असं म्हटलं होतं. त्याचसोबत बॉलिवूडमधील पॉवर शिफ्ट, सांप्रदायिकता यांवरही त्यांनी टिप्पणी केली. गेल्या आठ वर्षांत मला बॉलिवूडमध्ये काम मिळालं नसल्याचा खुलासा रहमान यांनी या मुलाखतीत केला होता.
