शाहरुख, सलमान स्टेजवर चालतो, मग गरब्यात मुस्लिम का नको? आयोगाचा खरमरीत सवाल

मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विरोध केला. त्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यावर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उपस्थितीत केलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

शाहरुख, सलमान स्टेजवर चालतो, मग गरब्यात मुस्लिम का नको? आयोगाचा खरमरीत सवाल
Nitesh Rane
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 1:21 PM

दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याबाबत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु झाला आहे. यावर आता अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी थेट तुम्हाला स्टेजवर शाहरुख खान चालतो, सलमान खान चालतो पण गरब्यामध्ये मुस्लिम चालत नाहीत असा खरमरीत सवाल केला आहे.

“प्रसिद्ध मुस्लिम व्यक्तींना स्टेजवर आमंत्रित करायचे”

प्यारे खान यांनी म्हटले की, एखाद्या हिंदू सणात किंवा उत्सवात मुस्लिमांना प्रवेश नाकारणे हा संबंधित आयोजकांचा अधिकार आहे. मात्र, याबाबत दुहेरी धोरण स्वीकारणे योग्य नाही. एकीकडे गरीब मुस्लिमांना प्रवेश नाकारायचा, त्यांच्याकडून आधार कार्डची मागणी करायची आणि दुसरीकडे शाहरुख खान, सलमान खान यांसारख्या श्रीमंत आणि प्रसिद्ध मुस्लिम व्यक्तींना स्टेजवर आमंत्रित करायचे, हे बरोबर नाही, असे ते म्हणाले.

“भारत हा गंगा-जमुना परंपरा सांगणारा देश”

प्यारे खान यांनी पुढे सांगितले की, भारत हा गंगा-जमुना परंपरा सांगणारा देश आहे. येथे विविध धर्म, संस्कृती आणि समुदाय एकत्र राहतात. अशा पार्श्वभूमीवर कोणत्याही उत्सवात किंवा कार्यक्रमात भेदभाव करणारे धोरण स्वीकारणे देशाच्या या पारंपरिक भावनेला धक्का पोहोचवणारे ठरू शकते.

नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर आलेल्या या प्रतिक्रियेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अहिल्यानगरमधील नवरात्र उत्सव आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये प्रवेशाबाबतची ही बाब आता अधिक लक्ष वेधून घेत आहे. अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षांनी दिलेल्या या प्रतिक्रियांनंतर संबंधित पक्ष आणि आयोजकांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले होते नितेश राणे?

नवरात्री उत्सव सुरु व्हायरला अजून जवळपास महिना बाकी आहे. मात्र, तो सुरु होण्याआधीच महाराष्ट्रात गरबा-दांडियावरुन राजकारण पेटले आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिमांना प्रवेश देण्यास विरोध केला आहे. जर मुस्लिमांना गरब्यात यायचं असेल तर त्यासाठी थेट धर्मांतराची अट घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र या भूमिकेला विरोध केला आहे.

अमृता फडणवीस यांनी देखील दिली होती प्रतिक्रिया?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या सर्वावर आपली परखड भूमिका मांडली आहे. ‘आपला उत्सव सर्वांचा समावेश करतो, एखादा मुस्लिम व्यक्ती जर गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर वाटत नाही,’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us