खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, एकत्र बसून मिटवून टाकू; महाजनांचा नेमका गौप्यस्फोट काय?

त्यांच्या मनात काय मिटवायचं होतं ते कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, एकत्र बसून मिटवून टाकू; महाजनांचा नेमका गौप्यस्फोट काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 03, 2022 | 10:55 AM

जळगाव: भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्याबाबतचे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. आधी खडसेंना भाजप नेते अमित शहा यांनी तीन तास बसवून ठेवले. त्यांना भेट दिलीच नाही, असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केला. तसेच रक्षा खडसे (raksha khadse) यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी केला. हा गौप्यस्फोट होत नाही तोच महाजन यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. खडसेंनी सर्व काही मिटवण्यासाठी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती, असा दावा महाजन यांनी केला आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का? असा सवाल केला जात आहे.

गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केलं. देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ एकनाथ खडसे आले. एकदा आपण बसू. हे मिटवून टाका. जाऊ द्या. असं खडसे आम्हा दोघांना म्हणाले. सध्या त्यांचं काय ते चाललेलं आहे. त्यांच्या मनात काय मिटवायचं होतं ते कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं. गिरीश महाजन यांनी त्रोटक माहिती दिल्याने खडसेंबाबतचा संभ्रम कायम आहे. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

नाथाभाऊ हे अमित शहांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते शहांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले होते. तीन तास बसले होते. मला शहांच्या कार्यालयातून फोन आला होता. मी माहिती घेतली. त्यावेळी शहांची भेट घेण्यासाठी आम्ही तीन तास त्यांच्या कार्यालयाबाहेर बसून असल्याचं रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असं ते म्हणाले.

एवढा वेळ बसूनही शहा यांनी खडसेंना भेट दिली नाही. हे स्वत: रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असा दावा महाजन यांनी केला होता. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.