आमचं उष्टं कुणी खाऊ नका, गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक सल्ला

| Updated on: Feb 14, 2020 | 7:30 AM

शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरुन मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आमचं उष्टं कुणी खाऊ नका, गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक सल्ला
Follow us on

जळगाव : हिंदुत्त्वाचा अजेंडा स्वीकारल्यानंतर मनसेनं औरंगाबाद शहराचं नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याचा मुद्दा उकरुन काढला आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसेत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी याच मुद्द्यावरुन गुरुवारी जळगावात मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडलं (Gulabrao Patil criticized MNS). औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी सर्वप्रथम शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आज प्रत्येक शिवसैनिक संभाजीनगर याच नावाचा पुनरुच्चार करतो. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये, अशा शब्दांत गुलाबरावांनी मनसेला टोला लगावला आहे.

गुलाबराव पाटील गुरुवारी (13 फेब्रुवारी) सकाळी जळगावात आले होते. जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटलांनी मनसे नेत्यांकडून शिवसेनेवर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा हा सर्वप्रथम शिवसेनेनं मांडला. औरंगाबादला संभाजीनगर असं म्हटलं जावं, ही मागणी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आजही शिवसैनिक हेच नाव म्हणतात. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये, अशी माझी सूचना असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत राज्याच्या सत्तेत सामील झालेल्या शिवसेनेचं हिंदुत्त्व आता संपुष्टात आलं आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असूनही शिवसेनेला औरंगाबादचं नामकरण ‘संभाजीनगर’ असं करता आलेलं नाही, अशी टीका मनसेच्यावतीने शिवसेनेवर केली जात आहे. एप्रिल महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेऊन मनसेनं शिवसेनेचा हिंदुत्त्वाचा मुद्दा ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न केल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेनं आपला झेंडा बदलला. त्यावरुनही चर्चेचं गुऱ्हाळ रंगलं होतं. आता औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा मुद्दा मनसेनं हाती घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेत घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“आमचं सरकार 5 वर्षे चालेल”

भाजपला आपले आमदार सांभाळायचे आहेत. त्यामुळे ते आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, लवकरच सत्तेत येऊ, अशी वक्तव्यं करत आहेत. मात्र, आमचं सरकार निश्चितच 5 वर्षे चालेल. गेली 5 वर्षे त्यांचे सरकार होते. परंतु, त्यांनी जी कामे केली नाहीत; ती आम्ही अवघ्या अडीच महिन्यात केली. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असो की आताच झालेला शासकीय कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा आठवड्याचा निर्णय असो, असे अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे भाजपने सत्तेत येण्याची बोंबाबोंब करू नये, असा चिमटा गुलाबराव पाटील यांनी भाजपला काढला.

दरम्यान, मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, गुलाबराव पाटील यांनी त्याचं समर्थन केलं आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं अंदाजपत्रक काढलं आहे. मंत्र्यांनी तशी मागणी केलेली नव्हती. बंगल्यांचे नूतनीकरण आवश्यक असेल म्हणूनच तसं अंदाजपत्रक काढण्यात आलं असेल, असा दावा गुलाबराव पाटलांनी केला.

Gulabrao Patil criticized MNS on Aurangabad