चंद्रकांत खैरेंचं वय झालंय, त्यांनी निवृत्ती घ्यावी : हर्षवर्धन जाधव

| Updated on: Feb 10, 2020 | 10:58 PM

चंद्रकांत खैरेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. नव्या मुलांना संधी द्यावी किंवा त्यांच्या मुलाला त्यांनी पुढे आणावं. आता निवांत राहुन नातवंडांसोबत मजेत दिवस घालवण्याचे खैरेंचे दिवस आहेत", असा टोला हर्षवर्धन जाधव यांनी लगावला (Harshvardhan Jadhav slams Chandrakant Khaire).

चंद्रकांत खैरेंचं वय झालंय, त्यांनी निवृत्ती घ्यावी : हर्षवर्धन जाधव
Follow us on

औरंगाबाद : “शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे वरिष्ठ आहेत. आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी”, असा सल्ला मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने 9 फेब्रुवारी रोजी काढलेल्या महामोर्चात हर्षवर्धन जाधव दिसले नव्हते. याच पार्श्वभूमीवर ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आजारपणामुळे आपण मोर्चाला उपस्थित राहू शकलो नाही, असं स्पष्टीकरण जाधव यांनी दिलं. दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली (Harshvardhan Jadhav slams Chandrakant Khaire).

“चंद्रकांत खैरे हे वरिष्ठ आहेत. आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार खैरे नेहमी करत असतात. आता खैरेंनी निवृत्ती घ्यावी. नव्या मुलांना संधी द्यावी किंवा त्यांच्या मुलाला त्यांनी पुढे आणावं. आता निवांत राहुन नातवंडांसोबत मजेत दिवस घालवण्याचे खैरेंचे दिवस आहेत”, असा टोला हर्षवर्धन जाधव यांनी लगावला (Harshvardhan Jadhav slams Chandrakant Khaire).

‘हिंदुत्वपासून शिवसेना दूर गेली’

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या आव्हानाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेवर टीका केली. “शिवसेनेचं आपल्यासमोर आव्हान असेल असं तरी मला वाटत नाही. शिवसेनेबाबत आता लोकांच्या मनात नकारात्मक छवी निर्माण झाली आहे. याला दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे इतक्या वर्षांपासून ते सत्तेत आहे. परंतु शहराला सुविधा देण्यास शिवसेना समर्थ नाही आणि हे आता स्पष्ट झालं आहे. हे मी बोलत नाही तर सर्वसामान्य बोलत आहेत. दुसरं म्हणजे हिंदुत्वपासून शिवसेना दूर गेली आहे”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.

‘शिवसेनेचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व’

“राज ठाकरे यांची दगडाने दगड आणि तलवारीने तलवारीला प्रत्युत्तर देऊ ही भूमिका शंभर टक्के बरोबर आहे. शिवसेनेचं हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे. मी शिवसेना सोडली म्हणून शिवसेनेचं हिदुत्वला बेगडी म्हणतो अशातला काही भाग नाही. कारण आज महाराष्ट्रात शिवसेना कशाप्रकारे काम करतेय ते आपण प्रत्यक्षपणे अनुभवतोय. शिवसेनेचं हिदुत्व हे बेगडी हिंदुत्व आहे आणि हे मीच नाही तर सर्वसामान्य माणूसदेखील तेच म्हणत आहे”, असं टीकास्त्र हर्षवर्धन जाधव यांनी सोडलं.

‘सर्वसामान्य शिवसेनेला रामराम ठोकून मनसेच्या पाठीमागे उभे राहतील’

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हिंदुत्व छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व आहे. स्वराज्याची संकल्पना, जनतेने जनतेचा प्रतिनिधी निवडावा, असा लोकशाहीचा विचार त्यात आहे. छत्रपती शिवरायाचं हिंदुत्व हे खूप गरजेचं आहे. मनसेच्या झेंड्यामध्येसुद्धा राजमुद्रा आहे. मनसे हिंदुत्ववादाचा आणि शिवरायांच्या हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्य मंडळी शिवसेनेला रामराम ठोकून मनसेच्या पाठीमागे उभे राहतील” असा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त करुन दाखवला.

‘राज ठाकरे नक्कीच यशस्वी होतील’

“काही हाती लागावं किंवा न लागावं हा प्रश्न दुय्यम आहे. पण आपली विचारसरणी काय आहे? हे ठरवणं आवश्यक आहे. ते राज ठाकरे यांनी ठरवलं आहे. कारण माणसाचं आत्मबल पक्क पाहिजे. याबाबत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील तेच सांगितलं आहे. आत्मबल पक्क राहिलं तर माणसाला कुणी हरवू शकत नाही. आज राज ठाकरे यांचं तेच झालंय. प्रचंड आत्मबळाने तो माणूस बाहेर पडला आहे. मला खात्री आहे राज ठाकरे नक्कीच यशस्वी होतील. राज ठाकरेंनी हे उभं केलं आहे ते निश्चितच समर्पित भावनेनं उभं केलं आहे”, असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला.

‘झेंड्यावर राजमुद्रा म्हणजे सर्वात जास्त मान राजमुद्राला दिला गेला आहे’

“राजमुद्रा ही महाराजांची खूप मोठी ठेवण आहे. भगवा झेंडाही छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. खरं म्हणजे राजमुद्राच्या विषयावरुन वाद सुरु होतो त्यावेळी असंही वाटतं की, राजमुद्रा नावाचे हॉटेल्स आणि बिअर बारही आहेत. त्याला कोणत्याही ठिकाणी विरोध होताना दिसत नाही. पण पक्षाचा झेंडा जो पक्षाचा मानाचा तुरा असतो त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. पक्षाचा आत्मसन्मान म्हणजे पक्षाचा झेंडा, पक्षाचं हृदय म्हणजे पक्षाचा झेंडा असतो. पक्षाचा झेंड्यावर राजमुद्रा म्हणजे सर्वात जास्त मान राजमुद्राला दिला गेला आहे”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले.