जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका

| Updated on: Dec 30, 2020 | 12:13 PM

शक्य तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आणि ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू, असं मुश्रीफ यांनी जाहीर केलं

जिथे ताकद तिथे स्वबळ वापरु, राष्ट्रवादीची पहिल्यांदाच जाहीर भूमिका
(डावीकडून) राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील
Follow us on

मुंबई/कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकांना (Kolhapur Municipal Corporation Election) काँग्रेस-राष्ट्रवादी -शिवसेना स्वबळावर सामोरे जाणार, की महाविकास आघाडी म्हणून, हे योग्य वेळी ठरेलच. मात्र स्वबळाच्या भाषेवरुन कोल्हापुरात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आधी स्वबळाचा नारा दिल्याचा दावा काँग्रेस नेते सतेज पाटील  (Satej Patil) यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही दंड थोपटले आहेत. “जिथे शक्य असेल तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आणि जिथे स्वबळाची ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू” असं मुश्रीफ यांनी जाहीर केलं. (Hasan Mushrif hints at going Solo in Kolhapur Municipal Corporation Election)

भाई जगतापांचे एकला चलो रे

काँग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पदभार स्वीकारताच बीएमसी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर कोल्हापुरातही बंटी पाटलांचा स्वबळाचा आवाज घुमला. त्यावर, “सरकार चालवणं सर्वांची जबाबदारी आहे. पक्षात आपली ताकद आहे असा आव आणत आपलं महत्त्व वाढवण्यासाठी काही वक्तव्यं होत आहेत” असा टोला लगावत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सर्वांचाच समाचार घेतला.

स्वबळाची खुमखुमी

पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांनी एकत्रित येत भाजपचा धुव्वा उडवला होता. मात्र आता मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काही नेत्यांना स्वबळाची खुमखुमी आल्याचं दिसत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि स्वबळाची चाचपणी करण्यासाठी तिन्ही पक्षातील काही नेते ‘एकला चलो रे’चा नारा देत आहेत.

सतेज पाटील भाषणात काय म्हणाले?

“कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सगळेच पक्ष वेगवेगळे लढण्याची भाषा करत आहेत. पदवीधर-शिक्षक मतदारसंघात आपण एकत्र निवडणुका लढवल्या. जिथे शक्य तिथे महाविकास आघाडी करण्याची गरज आहेच. परंतु विशिष्ट परिस्थितीत तसं करता येणार नाही. मी, हसन मुश्रीफ वगैरे वरिष्ठांशी बोलूच. तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे एकत्र निवडणूक लढवल्यास आमच्यातीलच एक-एक बाजूला जायला वेळ लागणार नाही.” असं सतेज पाटील कोल्हापुरात भाषणादरम्यान म्हणाले होते. त्यावेळी मंचावर हसन मुश्रीफही होते. Hasan Mushrif hints at going Solo in Kolhapur Municipal Corporation Election

“मी लहान भाऊ आहे, मला सगळ्यांना घेऊन जावं लागतं”

“पाच-दहा वॉर्डात आघाडी शक्य असेल तर बघू, पण संजयदादा (शिवसेना खासदार संजय मंडलिक) म्हणतात… परस्पर जाहीर करु नका, आता तुम्ही बोलल्याने मलाही बोलणं भाग पडतंय, की शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी सुरुवात केली. त्यांचा मेळावा पहिला झाला, मग मुश्रीफ साहेब बोलले, आणि मी सगळ्यात शेवटी… मी लहान भाऊ आहे, मला सगळ्यांना घेऊन जावं लागतं. जिल्हा परिषद असो किंवा गोकुळ… सगळ्यांची मोट बांधावी लागते.” असं सतेज पाटील म्हणत होते.

राजेश क्षीरसागर यांचे उत्तर काय?

“पालकमंत्री बंटी पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेसंदर्भात कसबा-बावडा इथे फिक्सिंग भाषणाचा मेळावा घेतला. या भाषणात कोल्हापूर महापालिकेत शिवसेना वेगळी लढेल, असं मी (राजेश क्षीरसागर) पहिल्यांदाच म्हटल्याचा आरोप केला. माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, की आपल्याकडे मोठी यंत्रणा आहे, गेल्या काही महिन्यातील वर्तमानपत्रं काढून पाहावीत. वेगळं लढूया असं पहिल्यांदा कोण म्हणालं, हे तुम्हाला दिसून येईल. तर इथे राष्ट्रवादीने पहिल्यांदा स्वतंत्र लढण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस म्हणाली. मग शिवसेनेसारख्या स्वाभिमानी पक्षात असताना आम्ही कुठे कमी आहोत. आम्ही तिथे संपूर्ण जागा लढू शकतो, या दृष्टीने मी वक्तव्य केलं.” असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.

संबंधित बातम्या :

‘काही जणांना जास्त बोललं की आपलं महत्त्व वाढेल असं वाटतं’, नवाब मलिकांचा नसीम खान यांना टोला

शिवसेनेचं बोट धरुन विधानसभेत आल्याचा सतेज पाटील यांना विसर, ‘स्वबळा’च्या आरोपांनंतर राजेश क्षीरसागर भडकले

(Hasan Mushrif hints at going Solo in Kolhapur Municipal Corporation Election)