सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन

| Updated on: Sep 24, 2021 | 5:07 PM

सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

सोमय्यांची अडवणूक करु नका, त्यांना येऊ द्या; हसन मुश्रीफांचं कार्यकर्त्यांना आवाहन
किरीट सोमय्या हसन मुश्रीफ
Follow us on

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडणवण्यात आलं होतं. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. (Hasan Mushrif’s appeal to activists not to obstruct Kirit Somaiya’s visit to Kolhapur)

किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्यावेळी प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कुणीही अडथळा निर्माण करु नका, त्यांना येऊ द्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही कृती करु नका. त्या दिवशी ऐकू वाटलं नाही तर टीव्ही बंद करा, शेतात जा. ते कुठे जातील, काय बोलतील ते त्यांना बोलू द्या, असं आवाहन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

‘सोमय्यांनीही संयमाने दौरा करावा’

तसंच सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

‘गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही’

शाहू कारखाना आणि हमीदवाडा कारखान्यात आपलं योगदान असताना काही कारणामुळे आपल्याला बाजूला व्हावं लागलं. मात्र शेतकरी, कामगार, मजूरांना आपल्या हक्काचा कारखाना असावा अशी भावना होती. तेव्हाच आम्हाला सहकारी कारखाना काढावा लागला. त्यांचा आरोप आहे की या कारखान्यासाठी मुश्रिफांनी सत्तेतून पैसा मिळवला असावा. पण एका केंद्रीय संस्थेकडून तपास झाला आहे. गैरव्यवहाराच्या एका पैशाचाही या कारखान्याशी संबंध नाही. उत्कृष्ट पद्धतीनं हा कराखानाचा चालला आहे, असा दावा मुश्रीफ यांनी केलाय.

‘ब्रिक्स इंडियाला 8 वर्षात 80 कोटीच्या वर तोटा’

आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना 2012 मध्ये बंद पडण्याच्या अवस्थेत होता. तेव्हा शेतकऱ्यांची विनंती होती की कारखाना सुरु ठेवावा. ब्रिक्स इंडिया या माझ्या मित्राच्या कंपनीला मी विनंती केली की कारखाना चालवावा. आठ वर्षात 80 कोटीच्या वर तोटा या कंपनीला आला. दोन वर्ष आधीच सगळं नुकसान सोसून ही कंपनी कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देऊन ही कंपनी गेली. सांगायचा उद्देश हाच की तपासणी करणाऱ्या यंत्रणेनं या कंपनीचं हार घालून स्वागत करायला हवं. कारण एवढा तोटा सहन करुन शेतकऱ्यांना एफआरपी दिला आहे. कामगारांचे पैसे दिले आहेत.

‘सरकार अस्थिर करण्यासाठी आरोपांची मालिका’

सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रतिमा निर्माण होण्यासाठी 20 ते 25 वर्षे लागतात. पण अशा चुकीच्या आरोपामुळे त्या प्रतिमेला एका क्षणात गालबोट लागतं. त्यामुळे चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप करु नयेत. महाविकास आघाडी भक्कम होत असताना तिला अस्थिर करण्यासाठी अनेक मंत्र्यांवर असे आरोप करुन घाबरवलं जात आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप हसन मुश्रीफ यांनी यावेळी केलाय.

इतर बातम्या :

आपल्या माता-भगिनींवर वेळ ओढावल्यावर कुठला कुटुंबप्रमुख अन्य राज्यातील परिस्थिती दाखवेल?, चंद्रकांतदादांचा सवाल

सोमय्यांना इशारा देत सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना फुल सपोर्ट, म्हणाले, ‘बदनामीचा कट हाणून पाडू’

Hasan Mushrif’s appeal to activists not to obstruct Kirit Somaiya’s visit to Kolhapur