शिवसेनेचं ‘उखाड दिया’ महाविकास आघाडीसाठी त्रासदायक?, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले…

| Updated on: Nov 28, 2020 | 1:12 PM

आमच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्याची यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. कोरोनाच्या काळातही राज्य शासनाने उत्तम काम केलं आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

शिवसेनेचं उखाड दिया महाविकास आघाडीसाठी त्रासदायक?, गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले...
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी तिन्ही पक्षातला समन्वय, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने घेतलेले निर्णय, कंगना तसंच अर्णव प्रकरण या विषयांवर आपली मतं मांडली. (Home Minister Anil Deshmukh On Shivsena And kangana Ranaut Case)

‘शिवसेनेचं ‘उखाड दिया’ हा आक्रमक स्वभाव महाविकास आघाडीसाठी त्रासदायक ठरतो का?’ असा प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, “कंगना रनौतच्या ऑफिसवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. त्याच्याशी राज्य शासनाचा काडीमात्र संबंध नाही. महाराष्ट्र सरकार महिलांचा सन्मानच करत आलं आहे. इथून पुढेही करेन. पण महाराष्ट्राच्या विरुद्ध कुणी काही बोलत असेल आणि त्याला एखादा राजकीय पक्ष पाठीशी घालत असेल तर ते चुकीचं आहे”

सरकार सूडाने काम करतंय, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले, “आरोप करणं हे विरोधकांचं काम आहे. अगोदरच्या सरकारने चुकीच्या पद्धतीने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी बंद केली. पण मी राज्य शासनाचा प्रतिनिधी आहे. नाईक कुटुंब मला येऊन भेटलं. त्यांनी वस्तुस्थिती माझ्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर राज्य शासनाने चौकशी लावली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करणारच असा इरादा यावेळी गृहमंत्र्यांनी बोलून दाखवला.

“आमच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्याची यशस्वीपणे वाटचाल सुरु आहे. कोरोनाच्या काळातही राज्य शासनाने उत्तम काम केलं आहे. आता अनलॉकिंग सुरु आहे. येत्या काळात महाराष्ट्र हिताचे निर्णय घेऊन राज्य प्रगतीपथावर नेऊ, असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

“विरोधकांनी कितीही पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणू द्या. आमचं सरकार पाच वर्ष काम करेन. तसंच त्यापुढेही आम्ही एकत्र सरकार स्थापन करु. सरकार पडणार हे विरोधकांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. विरोधकांना मुंगेरीलाल के हसीन सपने पाहण्याची सवय आहे. त्यांना स्वप्न पाहू द्यात. आम्ही महाराष्ट्राहिताचे निर्णय घेऊ. तिन्ही पक्षात उत्तम समन्वय आहे. त्यामुळे सरकार यशस्वीपणे पाच वर्ष पूर्ण करेन”, असं देशमुख म्हणाले. (Home Minister Anil Deshmukh On Shivsena And kangana Ranaut Case)

संबंधित बातम्या

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा जास्त चालणार, गृहमंत्री अनिल देशमुखांना विश्वास

केंद्रांच्या संस्था राजकीय हेतूने काम करत आहेत : अनिल देशमुख