‘माजी मंत्री म्हणू नका’ विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला, म्हणतात, ‘माझा हेतू तो नव्हता!’

| Updated on: Sep 19, 2021 | 10:20 AM

मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू चंद्रकांतदादांनी संकेतच दिले होते. पण आता 'मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो', अशी कोलांटउडी त्यांनी मारली आहे.

माजी मंत्री म्हणू नका विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला, म्हणतात, माझा हेतू तो नव्हता!
चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत नव्यानव्या विधानांमुळे चर्चेत असतात. पुण्यात बोलताना त्यांनी केलेल्या एका नव्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसांत कळेल, असं म्हणत राज्याच्या राजकारणात स्फोट होणार असल्याचे जणू त्यांनी संकेतच दिले होते. पण आता ‘मला माजी मंत्री म्हणू नका असं काही मी म्हणालोच नव्हतो’, अशी कोलांटउडी मारत त्या विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला आहे.

पुण्यात कसबा गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या विधानासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, “मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एका प्रसंगावेळी माजी मंत्री बाळा भेगडेंना उद्देशून मी म्हणालो होते, कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली”

विधानामागचा इतिहास चंद्रकांत पाटलांनी सांगितला!

चंद्रकांत पाटील यांनी अधिक स्पष्ट करताना सांगितलं की, “प्रसंग असा आहे की, देहू इथल्या एका सलूनच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो, तिथे घोषणा सुरू होती की माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी यांनी पुढे यावे. तर त्यावर मी म्हणालो की अरे माजी काय म्हणतो चार दिवसाने ते आजी होतील. त्यामुळे त्यात मला माजी मंत्री म्हणून नका असं काही मी म्हणालो नव्हतो. एवढ्या छोट्या गावातही कोणीतरी ही क्लीप तयार केली आणि ती फिरवली. आता सामाजिक जीवनामध्ये एकदा तुमच्या नावाने बील लागलं की एकामागून एक घटना घडत असतात. आता एवढंच म्हणतो की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू असा नव्हता की मला माजी मंत्री म्हणू नका…”

नेमक काय घडलं होतं..?

पिंपरी चिंचवड जवळील देहूगाव मधील एका खाजगी कार्यक्रमात मंचावरुन सूत्रसंचालकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल काय होतं, असं म्हणत राज्याच्या राजकारणात तीन दिवसांत संभाव्य भूकंप होणार असल्याचे संकेत चंद्रकांतदादांनी दिले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे मात्र राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा झाल्या. तसंच त्यांच्या वक्तव्यानंतर तर्क-वितर्कांना उधाण आलं. पाटील यांच्या बोलण्याच्या नेमका काय अर्थ असावा, याचे राजकीय कंगोरे उलगण्याचा बऱ्याच जणांनी प्रयत्न केला.

(i never said Dont call me a former minister says BJP Chandrakant Patil)

हे ही वाचा :

माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ