
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील युतीबाबातच्या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून त्यांना भावी सहकारी म्हटलं. यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेते युतीबाबत भाष्य करत आहेत. शिवसेना नेते आणि महसूल मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी शिवसेना भाजप युतीचे स्पष्ट संकेत दिले.
शिवसेना भाजप एकत्र आले तर मतदारांना आनंद होईल असं रावसाहेब दानवे म्हणाले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे तीन वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर युतीसाठी आमची तयारी आहे, असं शिवसेना नेते आणि महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. दोघेही औरंगाबादेत बोलत होते.
अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या अटीवर रावसाहेब दानवे यांनी मात्र स्पष्ट उत्तर देणं टाळलं. रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यात तुफान जुगलबंदी रंगली. अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर अनेक राजकीय आरोप केले. तर आरोपांयावर रावसाहेब दानवे यांनी मिश्किल उत्तरं दिली.
Raosaheb Danve_Abdul Sattar
औरंगाबादमधील भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या गोटात आनंद होईल असं वक्तव्य केलं. कारण रावसाहेब दानवे यांनी नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी पाठिशी राहण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, माझ्या राज्याच्या राजधानी आणि उपराजधानी जोडणारा लोहमार्ग मुंबई नागपूर बुलेट ट्रेन होणार असेल तर रावसाहेब मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमच्यासोबत आहे.
इतकंच नाही तर मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रुळ असतात, रुळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता”
संबंधित बातम्या
उद्धवजींना ‘रिअलाईज’ झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत : देवेंद्र फडणवीस