Rajya Sabha Election 2022: राजस्थानमध्ये तिसरा उमेदवार उतरवण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी, वासनिक जिंकले, उद्योगपती गोयल पराभूत

| Updated on: Jun 10, 2022 | 9:43 PM

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. मी तिन्ही नवनिर्वाचित खासदार प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचे अभिनंदन करतो. मला खात्री आहे की तिन्ही खासदार दिल्लीत राजस्थानच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा विश्वास अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे.

Rajya Sabha Election 2022: राजस्थानमध्ये तिसरा उमेदवार उतरवण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी, वासनिक जिंकले, उद्योगपती गोयल पराभूत
राजस्थानमध्ये तिसरा उमेदवार उतरवण्याची काँग्रेसची खेळी यशस्वी
Image Credit source: ANI
Follow us on

नवी दिल्ली : चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडले. महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान आणि कर्नाटक राज्यात मतदान झाले. या निवडणूक राजस्थानमध्ये काँग्रेस (Congress)ने बाजी मारली आहे. राजस्थानमधील चारपैकी तीन जागांवर काँग्रेसने विजयी (Win) पताका फडकावली आहे. तर एका जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. तीन विजयी उमेदवारांमध्ये मराठमोळ्या मुकूल वासनिकांचा समावेश आहे. काँग्रेसमधून रणदीप सूरजेवाला, मुकूल वासनिक, प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपकडून घनश्याम तिवारींनी विजयाची माळ गळ्यात घातली. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना हार पत्करावी लागली आहे. चारही राज्यात रंगतदार लढत आहे. सर्व ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी राजकीय वजनदार उमेदवार उभ केले होते.

कोणाचे किती उमेदवार उभे ?

राज्यसभेच्या चार जागांसाठी एकूण पाच उमेदवार उभे होते. यापैकी काँग्रेसचे 3, भाजपचा 1 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यापैकी काँग्रेसचे तीनही उमेदवार जिंकले तर भाजपचा एक उमेदवार जिंकला आहे. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांचा पराभव झाला. सुभाष चंद्रा यांना भाजपने पाठिंबा दिला होता. राजस्थान विधानसभेची संख्या 200 आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज होती. राज्यात काँग्रेसचे 105, भाजपचे 71 आमदार आहेत.

कुणाला किती मतं ?

राज्यसभा निवडणुकीत घनश्याम तिवारी यांना 43 मते, प्रमोद तिवारी यांना 41 मते, रणदीप सूरजेवाला यांना 43 मते आणि मुकूल वासनिक यांना 42 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना 30 मते मिळाली. काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आनंद व्यक्त केला आहे.

हा लोकशाहीचा विजय : अशोक गहलोत

राजस्थानमधील राज्यसभेच्या तीन जागांवर काँग्रेसचा विजय हा लोकशाहीचा विजय आहे. मी तिन्ही नवनिर्वाचित खासदार प्रमोद तिवारी, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला यांचे अभिनंदन करतो. मला खात्री आहे की तिन्ही खासदार दिल्लीत राजस्थानच्या हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा विश्वास अशोक गहलोत यांनी व्यक्त केला आहे. तीनही जागांसाठी काँग्रेसकडे आवश्यक बहुमत असल्याचे सुरुवातीपासूनच स्पष्ट झाले होते. मात्र भाजपने अपक्षांना उभे करून घोडेबाजाराचा प्रयत्न केला. आमच्या आमदारांच्या एकजुटीने या प्रयत्नाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला असेच पराभवाला सामोरे जावे लागणार आहे, असेही गहलोत म्हणाले. (In Rajasthan three Congress candidates won the Rajya Sabha elections)