जयंत पाटील सभेसाठी इंदापुरात आले, भाषण न करताच निघून गेले

| Updated on: Oct 12, 2019 | 8:46 PM

इंदापूरमधील आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ पळसदेव येथे जयंत पाटील (Indapur Jayant Patil) आणि अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेला वेळेत पोहोचता न आल्याने जयंत पाटील यांना भाषण न करताच निघून जावं लागल्याची घटना घडली.

जयंत पाटील सभेसाठी इंदापुरात आले, भाषण न करताच निघून गेले
Follow us on

बारामती : राजकारणात सक्रिय नेत्यांना वेळ पाळणं नेहमीच बंधनकारक असतं, असा अलिखित नियम प्रचलित आहे. मात्र वेळेत न पोहोचल्यास काय होतं याची प्रचिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Indapur Jayant Patil) यांच्यासह इंदापूरकरांना आली. इंदापूरमधील आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारार्थ पळसदेव येथे जयंत पाटील (Indapur Jayant Patil) आणि अमोल मेटकरी यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र सभेला वेळेत पोहोचता न आल्याने जयंत पाटील यांना भाषण न करताच निघून जावं लागल्याची घटना घडली.

सभेची आचारसंहिता संपल्याने आपण भाषण करू शकत नसल्याचं सांगत आपल्याआधी ज्या नेत्यांनी भाषण केलं तेच आपलं आवाहन आहे, असं सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माईकचा ताबा सोडला. त्यामुळे सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा आली.

अमोल मेटकरी हे सभास्थळी दाखल झाले, त्यांचं भाषणही सुरु झालं तरीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभास्थळी पोहोचले नव्हते. दोन वाजण्याच्या सुमारास ते सभास्थळी दाखल झाले आणि थेट भाषणासाठी उभा राहिले. जयंत पाटील आपल्या भाषणात काय सांगतात याची उत्सुकता असतानाच त्यांनी आपण भाषण करणार नसल्याचं जाहीर केलं. सभेची आचारसंहिता संपल्याने आपण भाषण करू शकत नसल्याचं सांगत आपल्याआधी ज्या नेत्यांनी भाषण केलं तेच आपलं आवाहन आहे असं सांगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माईकचा ताबा सोडला.

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रवादीने अनेक नेत्यांना प्रचारात उतरवलंय. इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी चुरशीची लढत होत आहे. त्यामुळे इंदापूरमध्येही अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाषण न करताच निघून गेल्याने कार्यकर्त्यांची घोर निराशा तर झालीच, मात्र त्याबद्दल उलटसुलट चर्चांनाही उधाण आलं.