NCP Ministers Meet Sharad pawar : आम्ही चुकलो… अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंददाराआड नेमकं काय घडलं?

उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमची बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. कारण आम्ही सरकारला समर्थन दिलेलं नाही. त्यामुळे ते बसण्याची व्यवस्था करतील अशी आशा आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

NCP Ministers Meet Sharad pawar : आम्ही चुकलो... अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंददाराआड नेमकं काय घडलं?
jayant patil
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 16, 2023 | 3:33 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांनची भेट घेतली. तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

भाष्य करणं योग्य नाही

या आमदारांनी शरद पवार यांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू, असं जयंत पाटील म्हणाले. ते अचानक भेटले आहेत. त्यातून काय उद्देश आहे. हे आज सांगणं अवघड आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावं असं म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितलं. पण शरद पवार यांनी काही भाष्य केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आनंदच होईल

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर सर्व लोक एकत्र आले तर पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल, असं पाटील म्हणाले.

दावा करणार नाही

विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबतही त्यांनी भाष्य केलं. आमची काँग्रेसशी चर्चा झाली आहे. ठाकरे गटाशीही चर्चा झाली आहे. आमच्याकडे संख्याबळ अधिक नसताना विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणं योग्य नाही. कागदावर आमचाच पक्ष मोठा आहे. कारण सोडून गेलेल्यांनी पक्ष सोडल्याचं म्हटलेलं नाही. पण तरीही विरोधी पक्षनेतेपदावर आम्ही दावा करणार नाही. आमच्याकडे सध्या 19 ते 20 आमदार आहेत, असं त्यांनी सांगितलं.