Jayant Patil : पंकजा मुंडेंच्या नाराजीबाबत जयंत पाटलांनी बोलणं टाळलं, तर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा खळबळजनक दावा

एका विशिष्ट उद्देशानं, सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी झाली आहे, त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही तर ते नाराज राहणारच, असं सांगत पाटील यांनी पंकजांच्या नाराजीबाबत बोलणं टाळलं. मात्र, शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा दावा त्यांनी केलाय.

Jayant Patil : पंकजा मुंडेंच्या नाराजीबाबत जयंत पाटलांनी बोलणं टाळलं, तर शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा खळबळजनक दावा
जयंत पाटील, पंकजा मुंडे
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 7:56 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत गुरुवारी सिल्व्हर ओकवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरुन वाटतं का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, शिववसेनेचा शिंदे गट आहे त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. भाजपमधील नाराजीची मला माहिती नाही. पण शिंदे गटातील नाराजी वेगवेगळ्या वेळी व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे एका विशिष्ट उद्देशानं, सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी झाली आहे, त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही तर ते नाराज राहणारच, असं सांगत पाटील यांनी पंकजांच्या नाराजीबाबत बोलणं टाळलं. मात्र, शिंदे गटात मोठी नाराजी असल्याचा दावा त्यांनी केलाय.

बैठकीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, राज्यातील विविध प्रश्नांची चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली. अधिक आक्रमकपणे विधिमंडळात आपली भूमिका बजावू याबाबत चर्चा झाली. काही पक्षांतर्गत मुद्द्यावरही चर्चा झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं गणपती झाल्यावर राज्यपातळीवरील एक अधिवेशन शिर्डीला घेतलं जाणार आहे. त्याची तारीख सप्टेंबरच्या शेवटची असेल. त्या दृष्टीने सूचना देण्यासाठीही पवार साहेबांनी बैठक बोलावली होती.

उद्धव ठाकरेंसोबत अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा

बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट होती ती ते मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाल्यानंतरची भेट होती. या भेटीत बऱ्याच चर्चा झाल्या, चर्चा झाली नाही असं नाही. सध्याची राज्यातील राजकीय स्थिती, अन्य जे विषय आहेत राज्यातील त्याची साधकबाधक चर्चा झाली. ती एक केवळ सदिच्छा भेट होती. आज पवारसाहेब मुंबईला आले होते, म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना बोलावून वेगवेगळ्या विषयांची चर्चा केली, अशी माहिती पाटील यांनी दिलीय.

‘पटोलेंशी बोलल्यावर त्यांची भूमिका आमच्याशी सुसंगत होईल’

आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आघाडीतील सर्व पक्ष काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, शेतकरी कामगार पक्ष आहे, त्या सर्वांशी स्थानिक पातळीवर चर्चा करुन गरज असेल तिथे आघाडी करण्याचा निर्णय झालेला आहे. पवारसाहेबांनीही तशा सूचना आम्हाला दिल्या आहेत. काँग्रेस आमच्यासोबत आहे, अशोक चव्हाण सकाळी आमच्यासोबत होते. बाळासाहेब थोरात आहेत, काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांची भूमिका एकत्रित जाण्याचीच असेल यात मला काही शंका वाटत नाही. नाना पटोले मुंबईत आल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांचीही भूमिका आमच्याशी सुसंगत होईल यात मला काही शंका नाही, असंही पाटील यांनी सांगितलं.

Follow Us