ठरल्याप्रमाणे महापौरपद द्या, भाजपची मागणी, आपलं ठरलंच नव्हतं, शिवसेनेकडून हात वर

| Updated on: Nov 18, 2019 | 6:41 PM

कल्याण-डोंबिवली महापालिकेत शेवटचे एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचं ठरलं होतं, असा दावा भाजपने केला आहे

ठरल्याप्रमाणे महापौरपद द्या, भाजपची मागणी, आपलं ठरलंच नव्हतं, शिवसेनेकडून हात वर
Follow us on

कल्याण : राज्यानंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही (Kalyan-Dombivali Municipal Corporation) शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद पाहायला मिळत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत शेवटचे एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचं ठरलं होतं, असा दावा भाजपने केला आहे (BJP-Shivsena Alliance). मात्र, शिवसेनेने असा कोणताही करार झालेला नसल्याचे सांगत हात वर केले. त्यामुळे सध्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत महापौरपदावरुन नव्या वादाला तोंड फुटल्याचं चित्र आहे (KDMC Mayor).

2015 च्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत युती नव्हती. या निवडणुकीत शिवसेनेचे 53, भाजपचे 43, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4, कॉंग्रेसचे 2, मनसे 9, अपक्ष 9, बसपाचे 1, एमआयएमचे 1 असे निवडणून आले होते. या निवडणुकीत बहुमताचा आकडा 62 होता. ऐनवेळी भाजप-शिवसेनेची युती झाली आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेचं महापौरपद शिवसेनेकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे गेलं. सध्या शिवसेनेच्या विनिता राणे या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर आहेत, तर भाजपच्या उपेक्षा भोईर या उपमहापौर आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचं महापौरपद हे गेल्या 4 वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, तर उपमहापौर भाजपकडे आहे. 4 पैकी स्थायी समितीचे 2 सभापती शिवसेनेचे, तर 2 भाजपचे आहेत. स्थायी समितीच्या 8 सदस्यांची निवड आता होणार आहे. मात्र, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेना-भाजपमध्ये महापौर पदावरून चांगलीच जुंपली आहे.

2015 मध्ये ज्यावेळी युती झाली, तेव्हा शेवटचे एक वर्ष महापौरपद भाजपला देण्याचे ठरले होते, असा दावा भाजपने केला. आता शिवसेनेने ठरल्याप्रमाणे हे महापौरपद भाजपला द्यावे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. मात्र, शिवसेनेकडून असा कुठलाही करार झालेला नाही, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीचं स्थानिक राजकारण तापलं आहे.

‘असं काहीही ठरेलेलं नाही. महापौर हा शिवसेनेचाच राहणार. या विषयावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील’, असं कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी सांगितलं.

50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन भाजप-शिवसेना युतीत फूट

राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मंत्रिमंडळातील पदांच्या वाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये तेढ निर्माण झाला. भाजपने सत्तेत समान वाटा देण्याचं म्हटलं होतं, त्यामुळे त्यांनी इतर पदांप्रमाणेच मुख्यमंत्रिपदही अडीच-अडीच वर्ष द्यावं, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर भाजपने अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. याच कारणावरुन भाजप-शिवसेनेच्या युतीत फूट पडली. भाजपने शब्द फिरवला असा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून महासेनाआघाडीचं सरकार स्थापन करणार असल्याचं शिवेसेनेकडून सांगितलं जात आहे. मात्र, सत्तास्थापनेबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.