महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल, तर आशिष शेलारांचं पोलिस आयुक्तांना पत्र

| Updated on: Dec 08, 2021 | 10:12 PM

किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Thane) गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली.

महापौर किशोरी पेडणेकरांकडून आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल, तर आशिष शेलारांचं पोलिस आयुक्तांना पत्र
किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद
Follow us on

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Thane) गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आशिष शेलारांचं मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र

एकीकडे किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे शेलार यांनीही पेडणेकरांनी केलेली तक्रार पडताळून पाहण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहिलं आहे. ‘मी मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहून वस्तुस्थितीमध्ये फेरफार केल्याचा निषेध व्यक्त करत आणि सत्ताधारी पक्षाच्या घटकांकडून माझ्यावर खोटा खटला भरण्याच्या दबावाला विरोध केला आहे’, असं ट्विट करत शेलार यांनी पत्राबाबत माहिती दिलीय.

किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र

मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.

आशिष शेलारांचा आरोप काय?

आशिष शेलार यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जातात. पण तिथे सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर 72 तासांनी रुग्णालयात पोहचल्या. 72 तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चाललंय काय? असा सवाल शेलार यांनी केला.

इतर बातम्या :

उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्रात काय करता येईल? संजय राऊत आणि प्रियंका गांधींची दिल्लीत तासभर खलबतं

‘बिपिन रावत यांची अपूर्व सेवा भारत कधीही विसरणार नाही’, पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली अर्पण, राष्ट्रपती, संरक्षणमंत्र्यांकडूनही आदरांजली