महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, अजित पवार यांच्याकडून गौप्यस्फोटांवर गौप्यस्फोट, पडद्यामागील घडामोडींचा थेट खुलासा
महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडी 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील घडत होत्या. तसेच 2014 पासून वारंवार अनेक भेटीगाठी घडून आल्या आहेत. या घडामोडींबाबात अजित पवार यांनी आज आपल्या भाषणात थेट खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या भाषणात पुन्हा मोठे गौप्यस्फोट केले आहेत. “2017 मध्ये भाजप-शिवसेनेसोबत जाण्याची चर्चा झाली होती”, असं अजित पवार म्हणाले आहेत. “भाजप शिवसेनेसोबतची दोस्ती तोडू शकत नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते”, असंदेखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. “आम्हाला शिवसेना अजिबात चालत नसल्याचं त्यावेळी शरद पवार म्हणाले होते. शिवसेना चालत नसल्यामुळेच त्यावेळी चर्चा पुढे गेली नाही”, असंदेखील अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. “इतकंच नाही तर 2019 ला एका उद्योगपतीच्या घरी पुन्हा एकदा चर्चा झाली होती. कुणाला कोणतं पद द्यायचं? याबाबतही चर्चा झाली होती. पण मागचा अनुभव चांगला नव्हता, असं अमित शाह त्यावेळी म्हणाले होते”, असा देखील खुलासा अजित पवार यांनी केला आहे. “तुम्ही शब्दाचे पक्के आहात, शपथ घ्यावी लागेल, असं अमित शाह यांनी सांगितलं होतं. मग भाजपसोबत जाण्याचं ठरवलं, असा इतिवृतांतच अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“शरद पवारांनी सुनील तटकरे यांना 2017 मध्ये दिल्लीत बोलावलं आणि म्हणाले, आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे. तिकडे दिल्लीमध्ये अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली. अमित शाह म्हणाले, आमची अनेक वर्षांपासून भाजप आणि शिवसेनेची दोस्ती आहे. आम्ही ती दोस्ती तोडू शकत नाहीत. तुम्ही सरकारमध्ये या. आम्ही घेऊ. तुम्हाला त्या पद्धतीने मंत्रीपद देऊ, खाती देऊ, पण आम्ही त्यांना सत्तेतून काढणार नाहीत. तुम्ही सत्तेत आले म्हणून ते गेले तर गोष्ट वेगळी. पण आम्ही त्यांना सत्तेतून काढणार नाहीत. आमच्या साहेबांनी सांगितलं की, मला शिवसेना अजिबात चालत नाही. ते असतील तर मी सरकारमध्ये येणार नाही. अमित शाह म्हणाले, मी त्यांना सोडणार नाही. ते म्हणतील, हे बरंय, वापरुन घेतलं आणि वाऱ्यावर सोडलं. ते झालं. आपण सरकारमध्ये गेलो नाहीत”, असं अजित पवारांनी सांगितलं.
‘उद्योगपतीच्या घरी बैठक व्हायची’
“मी, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि पलिकडे समोर वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे नेते आमच्याशी चर्चा करायला होते. कुठली मंत्रीपदं, कुणाला कुठली आमदारकी, कुणाला कुठली खासदारकी याबाबत आमची चर्चा. का? तर आम्हाला सरकारमध्ये जायचंय. जसा आदेश होता. पण नंतर मध्ये ते बारगळलं. त्यात शिवसेना आम्हाला अजिबात चालत नव्हती. 2019 ची निवडणूक झाली. त्यामध्ये कुणालाच बहुमत आलं नाही. आम्हाला दिल्लीमध्ये बोलावून घेतलं. प्रफुल्ल पटेल, मी, शरद पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एक उद्योगपती यांच्यात बैठक झाली. उद्योगपतीच्या घरी बैठक व्हायची. कुणाच्या बापाला कळायचं नाही. आम्ही विमानातून उतरलो की, आपले तिथे बरोबर जायचो”, असा खुलासा अजित पवारांनी केला.
‘अमित शाह मला म्हणाले, तू शब्दांचा पक्का आहेस’
“पाच-सहा बैठका झाल्या. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री, पालकमंत्री कोण, विभाग कोणते वगैरे ठरलं. परत आम्ही मुंबईला आलो. तिथे अमित शाह मला बंगल्यावर म्हणाले, आम्हाला जुना अनुभव चांगला नाही. तू शब्दांचा पक्का आहेस. तुझ्यादेखल हे सर्व ठरलं आहे. प्रफुल्लभाई आहेत. हे असंच करायचं. मी म्हटलं, हो, ठरलं आहे तर करायचं. मु्ंबईला गेल्यावर सांगितलं की, आता राष्ट्रपती राजवट आणा. राष्ट्रपती राजवट आली. आम्ही म्हटलं ही राष्ट्रपती राजवट कशाला? ते म्हणाले की, लोकांना असं वाटेल की, पुन्हा निवडणुकी होतील. मग आपण कुणाशी मिळतंजुळतं घेतलं पाहिजे. नाहीतर सारख्या निवडणुका परवडणार नाही. त्यानंतर म्हणाले, आता आपण भाजपसोबत जायचं. पण ते राहिलं बाजूलाच. नंतर एकदम काँग्रेस, शिवसेना आणि आम्ही चर्चा करायला लागलो. त्यांना म्हटलं, मागचं काय झालं? ते म्हणाले, दोन्ही रस्ते आपल्याला फ्री ठेवायचे. इकडे का तिकडे ते ठरवू”, असा मोठा खुलासा अजित पवारांनी केला.