प्रदेश कार्यकारिणी बरखास्त, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, नवीन जबाबदारी कुणाकडे?

लोकसभा निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात पक्षाला नव्याने उभारी देण्याचे काम करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रदेश कार्यकारिणी बरखास्त, काँग्रेसने घेतला मोठा निर्णय, नवीन जबाबदारी कुणाकडे?
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 21, 2024 | 9:08 PM

लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खर्गे यांनी ओडिशा राज्य काँग्रेस कमिटी बरखास्त केली आहे. यासोबतच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना नूतन अध्यक्ष निवडीपर्यंत हंगामी अध्यक्ष करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यासंदर्भातील एका निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ओडिशा राज्य काँग्रेस कमिटी (ओपीसीसी) विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे असे म्हटले आहे.

सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्यासोबतच इतर पदाधिकारी, जिल्हा, ब्लॉक आणि मंडल स्तरावरील कार्यकारी समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कमिटी, संघटना, विभाग, सेल तत्काळ प्रभावाने ही समिती पूर्णपणे विसर्जित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे नवीन जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत विद्यमान अध्यक्ष हे कार्यवाह अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असेही सांगण्यात आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब झाली होती. त्यामुळे ओडिशामधील काँग्रेस नेत्यांच्या एका गटाने प्रदेश अध्यक्ष शरत पटनायक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी हा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये काँग्रेसने विधानसभेत 14 जागा मिळवल्या. परंतु, पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरली. तर, लोकसभा निवडणुकीत कोरापुट ही एकमेव जागा वाचवण्यात यश आले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ओडिशा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांवर शाई फेक केली होती. या प्रकरणी काँग्रेसने पाच स्थानिक कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली होती.

दरम्यान, AICC ने तीन वेळा आमदार असलेले आदिवासी चेहरा रामचंद्र कदम यांची विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे. बासुदेवपूरचे आमदार अशोक दास यांची उपनेतेपदी तर आदिवासी आमदार सीएस राजेन एक्का यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.