निवडणुका घ्या, पोषक वातावरण, गुप्तचर अहवालाने ठाकरे सरकारला मोठा दिलासा

| Updated on: Dec 25, 2020 | 2:47 PM

गुप्तचर खात्याने आगामी निवडणुकांचा अंदाज घेण्यासंबंधी अहवाल ठाकरे सरकारकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.

निवडणुका घ्या, पोषक वातावरण, गुप्तचर अहवालाने ठाकरे सरकारला मोठा दिलासा
महाविकास आघाडी
Follow us on

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल ठाकरे सरकारकडे आला आहे. राज्याच्या गुप्तचर विभाग यंत्रणेने हा अहवाल दिल्याची माहिती आहे. विधानपरिषद‌ निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी विजयी पताका लावण्याची शक्यता आहे. (Maha Vikas Aghadi has positive political future in elections)

विधानपरिषदेप्रमाणेच आगामी महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिला आहे. गुप्तचर खात्याने ठाकरे सरकारकडे अहवाल सुपूर्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी सरकारचा विश्वास दुणावला आहे.

राज्यात कोणकोणत्या महापालिका निवडणुका?

राज्यातील पाच महापालिका आणि तब्बल 96 नगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात लागण्याची चिन्हं आहेत. या पालिका-नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचाही समावेश आहे.

महाविकास आघाडीस मुख्यमंत्री अनुकूल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही याचा पुनरुच्चार केला. मात्र काँग्रेकडून मुंबई महापालिकेबाबत अद्याप स्पष्टोक्ती नाही. परंतु नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास झेंडा फडकावणे कठीण जाणार नाही.

जानेवारी महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी

जानेवारी महिन्यात राज्यातील 14, 232 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होईल, तर 18 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत महाविकासआघाडीने विधानपरिषद निवडणुकीतील कामागिरीची पुनरावृत्ती करायचे ठरवले आहे. तर भाजपने विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण सामर्थ्याने लढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा धुरळा?

(Maha Vikas Aghadi has positive political future in elections)