मुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घोषणा केलेल्या 7 मंत्र्यांचं काय झालं?

| Updated on: Oct 24, 2019 | 6:49 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचारसभांमध्ये 7 उमेदवारांना मंत्री (Future Minister of Fadnavis Ministry) करण्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनी निकालाआधी घोषणा केलेल्या 7 मंत्र्यांचं काय झालं?
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रचारसभांमध्ये 7 उमेदवारांना मंत्री (Future Minister of Fadnavis Ministry) करण्याची घोषणा केली होती. फडणवीसांनी आपल्या विविध प्रचारसभांमध्ये संबंधित उमेदवाराला निवडणून द्या, मी त्यांना मंत्री करतो, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, लोकांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनाला साफ नाकारलेलं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालात संबंधित 7 भावी मंत्र्यांपैकी (Future Minister of Fadnavis Ministry) तब्बल 4 जणांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या उमेदवारांना मंत्री करण्याचं स्वप्न अपूर्ण राहणार असल्याचं चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis ministry) कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांना, माण-खटावमध्ये जयकुमार गोरे यांना, यवतमाळमध्ये निलय नाईक यांना, पुसदमधून राहुल आहेर, पुरंदरमधून विजय शिवतारे, मावळमधून बाळा भेगडे यांना आणि दौंडमधून राहुल कुल यांना मंत्री बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

पराभूत भावी मंत्री

  • राम शिंदे (कर्जत जामखेड)
  • निलय नाईक (यवतमाळ)
  • विजय शिवतारे (पुरंदर)
  • बाळा भेगडे (मावळ)

विजयी भावी मंत्री

  • जयकुमार गोरे (माण-खटाव)
  • राहुल आहेर (पुसद)
  • राहुल कुल (दौंड)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, “महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना 2014 पेक्षा दुप्पट मताधिक्याने विधानसभेत पाठवा. मी त्यांना मंत्री करतो. राहुल कुल यांच्या पाठिशी सरकार भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे तुम्ही विकासाची काळजी करू नका.” कुल निवडून आल्यानंतर येथील लोकलचा प्रश्न एक वर्षात मार्गी लावतो, असंही आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुल यांच्या प्रचारार्थ 17 ऑक्टोबरला चौफुला येथे सभा घेतली होती. फडणवीस म्हणाले होते, “धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदिवासींच्या सवलती लागू केल्या आहेत. त्यासाठी 1 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मुळशीचे पाणी आल्यानंतर दौंड, बारामती, इंदापूर तालुक्याचे चित्र बदलणार आहे. बेबी कालव्याच्या विस्तारीकरणासाठी पैसे दिले आहेत. आजची गर्दी पाहून कुल यांचा विजय पक्का आहे.”