
भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नागपूर आणि मुंबई येथील कार्यक्रमात ते सहभागी झाले. काही विकास प्रकल्पांची उद्घटन करताना त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढायचं की, युती करुन याची चाचपणी करण्याचे अमित शाह यांनी भाजप नेत्यांना निर्देश दिले आहेत. मुंबई, ठाणे आणि पुणे या राज्यातील तीन महत्त्वाच्या महापालिका आहेत. महाराष्ट्रात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांच महायुतीच सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे घटक आहेत.
अमित शाह यांनी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे स्वबळावर लढता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देश भाजप नेत्यांना दिले आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत भाजपची चांगली ताकद आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे यांची ताकद आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांची बऱ्यापैकी ताकद आहे. अशा स्थितीत बेरजेच गणित जुळवायचं की, स्वबळाच त्याची चाचपणी केली जाईल. त्याशिवाय नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते.
एकनाथ शिंदेंकडून किती जागांची मागणी?
बहुतांश कार्यकर्ते ही निवडणूक लढवण्याची तयारी करतात. लोकसभा आणि विधानसभेपेक्षा स्थानिक पातळीवरील या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचा धोका असतो. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात युती-आघाडी असली, तरी मोठे पक्ष अशा निवडणुकांमध्ये स्वबळाचा मार्ग निवडतात. दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शाहंकडे 107 जागांची मागणी केल्याची सूत्रांची माहिती आहे.