BIG BREAKING : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी ‘या’ महिन्यांमध्ये, महाराष्ट्राचा नेमका मूड काय? आता लवकरच समजणार

| Updated on: Apr 21, 2023 | 8:53 PM

राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

BIG BREAKING : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी या महिन्यांमध्ये, महाराष्ट्राचा नेमका मूड काय? आता लवकरच समजणार
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांच्या महापालिकांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. या महापालिकांची निवडणूक कधी होईल? याबाबत वारंवार प्रश्न उपस्थित होतोय. काही महापालिकांचा कार्यकाळ तर कोरोना काळातच संपला आहे. पण तरीही निवडणूक आयोगाकडून अद्याप महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. पण आता याच विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकींचं बिगूल आता लवकरच वाजण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांकडून याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

राज्यात आगामी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे महापालिका निवडणुकांबाबत पुण्यात भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीकडे स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका लागू शकतात. त्या दृष्टीकोनाने तयारीला लागण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्राचा नेमका मूड काय? लवकरच स्पष्ट होणार

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना बघायला मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतरच महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्यांना सहज पचनी पडणार नाहीत, अशा घडामोडी घडल्या. शिवसेनेची भाजपसोबतची युती तुटली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत भाजपने 36 तासांचं सरकारही स्थापन केलं. पण पुढे अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की ते सरकार फार काळ टिकलं नाही.

हे सुद्धा वाचा

नंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या दरम्यान भाजपकडून सातत्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे दावे करण्यात आले. मधल्या काळात कोरोना संकट उभं ठाकलं. या संकटानंतर नऊ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदारांसह बंड पुकारलं. ते सर्व आमदारांना घेऊन सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात युतीचं नवं सरकार स्थापन झालं. या काळात शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळालं.

या सगळ्या घडामोडींनंतर आता महाराष्ट्रातील राजकारण्यांची खरी परीक्षा असणार आहे. कारण राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमधून नागरिकांच्या मतांमधून नेमका कल काय आहे? नेमकी भूमिका काय आहे, ते स्पष्ट होणार आहे. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणूक असंही मानलं जातं. कारण या निवडणुकीत महाराष्ट्राला नेमका मूड काय? हे स्पष्ट होतं. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.