आत्ताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, अजित पवारांनी प्रश्न निकाली काढला?

| Updated on: Jun 15, 2021 | 4:16 PM

महाविकास आघाडीतील 'फॉर्म्युल्या'बाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता आताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

आत्ताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा, अजित पवारांनी प्रश्न निकाली काढला?
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

पुणे : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र आणि जोमाने लढणार असल्याचं सांगतात. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र वारंवार स्वबळाचा नारा देत आहेत. अशातच त्यांनी अकोल्यात बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतही इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील ‘फॉर्म्युल्या’बाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता आताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. ते पुण्यात बोलत होते. (Ajit Pawar’s reply to Nana Patole’s statement as CM Post)

महाविकास आघाडीमध्ये आताचा फॉर्म्युला हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आहे. नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्यात अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 145ची मॅजिक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो, असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत स्थापन केलं आहे. हे तिघे नेते जोपर्यंत सरकारच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार भरभक्कम आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. शिवसेना असेल किंवा काँग्रेस प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचंही अजितदादा म्हणाले.

‘तुला चीफ एडिटर व्हावं वाटत नाही का?’

अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरातही या प्रश्नावर उत्तर दिलं होतं. स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. आमची आघाडी असली तर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. काँग्रेसनं कुणाबरोबर निवडणुका लढवाव्या किंवा काय हा अधिकार सोनिया गांधींचा आहे. राष्ट्रवादीने कुणाबरोबर आघाडी करावी न करावी हा अधिकार पवार साहेबांचा आहे. तसा शिवसेनेचा अधिकार उद्धव ठाकरेंना आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. त्यावेळी पत्रकारांनी नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याबाबतही प्रश्न विचारला. त्यावेळी तू ज्या चॅनेलमध्ये काम करतो तिथं तुला मुख्य संपादक व्हावं असं तुला वाटत नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केलाय. अजितदादांच्या या उत्तरामुळे उपस्थित पत्रकारांमध्ये चांगलाच हशा पिकला.

मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही – पटोले

नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला होता. तसंच केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नव्हे तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं म्हणाले होते. इतकंच नाही तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं. आता यासर्वांवर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं.

नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केलेला अकोल्यातील एक ढाबेवाला होता, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तो म्हणाला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून बघायचा आहेत. त्याला उत्तर देताना म्हणालो की त्यासाठी काँग्रेस आमदार निवडून दिले पाहिजेत. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री”

संबंधित बातम्या :

नानाभौ कसे मुख्यमंत्री होणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा किती वास्तववादी?; वाचा सविस्तर

नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय? विजय वडेट्टीवार काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला काय वाटतं?

Ajit Pawar’s reply to Nana Patole’s statement as CM Post