Ajit Pawar : शेवटपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा, अजित पवारांकडून राष्ट्रवादीची भूमिका जाहीर

| Updated on: Jun 23, 2022 | 7:00 PM

राऊत यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलीय.

Ajit Pawar : शेवटपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा, अजित पवारांकडून राष्ट्रवादीची भूमिका जाहीर
अजित पवार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. अशावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन शिवसेनेकडून करण्यात येत आहे. अशावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार सोडायला तयार आहोत, पण आमदारांनी 24 तासांत परत यावं असं वक्तव्य केलंय. राऊत यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना शेवटपर्यंत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलीय.

‘आमची भूमिका ही आघाडी सरकार टिकवण्याची’

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थितीत निर्माण झाली आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हे सरकार कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत राहील. माझं दुपारीही त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. आताही आदित्य ठाकरे यांच्याशी दुसऱ्या एका कामासाठी बोललो. काही आमदार परत आले आहेत. त्यात नितीन देशमुख, कैलास पाटील असतील, यांनी आपली भूमिका मांडली आहे. तिकडे गुवाहाटीमध्ये असलेल्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं आहे. आजही त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केलं आहे. पण आमची भूमिका ही आघाडी सरकार टिकवण्याची आहे, असं अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय.

निधी वाटपातील दुजाभावाचे आरोप फेटाळले

दुसरीकडे अजित पवार यांच्यावर निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यावर बोलताना अजितदादा म्हणाले की, आमच्यातील काही मित्रपक्ष काही वेगळे प्रश्न उपस्थित करत आहेत की अजित पवारांनी निधीचं असं केलं तसं केलं. सरकार अस्तित्वात आल्यावर आपण सगळ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री नेमले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केलेली नाही. पण कशामुळे त्यांनी तसं वक्तव्य केलं माहिती नाही. पण मी सगळ्यांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी असं चॅनेलवर बोलण्यापेक्षा आमची बैठक होते त्यावेळी सांगितलं असतं तर तिथेच समज-गैरसमज दूर झाले असते. आता तिघांची आघाडी आहे ती कशी टिकेल, आताची परिस्थिती कशी हाताळता येईल, यासाठीच प्रयत्न करत आहोत.