भेळ खायला उदयनराजेंच्या ‘जलमंदिर पॅलेस’मध्ये गेलो होतो : विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 04, 2020 | 11:04 AM

भेळ खायला आणि चहा प्यायला उदयनराजेंकडे गेलो होतो, अशी मिश्किल टिपण्णी वडेट्टीवारांनी केली. (Vijay Wadettiwar meeting with Udayanraje Bhonsle)

भेळ खायला उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये गेलो होतो : विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar meet Udayanraje Bhonsle
Follow us on

सातारा : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच्या पूरग्रस्त पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. काल त्यांनी सातारा जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेतली. महापुराच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. या दौऱ्यादरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते आणि राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावर पत्रकारांनी त्यांना भेटीविषयी विचारले असता, भेळ खायला आणि चहा प्यायला उदयनराजेंकडे गेलो होतो, अशी मिश्किल टिपण्णी केली. (Vijay Wadettiwar meeting with Udayanraje Bhonsle)

उदयनराजे भोसले यांनी या भेटीचा तपशील सोशल मीडियावर शेअर केला. “विजय वडेट्टीवार यांनी जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. तसेच कोयना धरण आणि अभयारण्यग्रस्त लोकांच्या अनेक पिड्यांपासून प्रलंबित पुनर्वसनच्या प्रश्नांबाबत गांभिर्याने चर्चा झाली. यावेळी निवेदनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. तसंच छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि मानव विकास संस्था (सारथी) च्या बाबतीत होत असलेल्या घटनांबाबत सकारात्मक विचार करुन, योग्य तो निर्णय घेऊन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आणि संस्थेला न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली”. असं उदयनराजे म्हणाले.

यावेळी मंत्री महोदयांनी कोयना धरणग्रस्त आणि सारथी संस्थेच्या बाबतीत तातडीने दखल घेऊन शक्य तितक्या लवकर मंत्रालयीन स्तरावर प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यांचं उदयनराजेंनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

पगार थकू देणार नाही : वडेट्टीवार

मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची सातारा जिल्हाप्रशासना सोबत बैठक पार पडली. यावेळी पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, माझ्या विधानाचा विपर्यास केला जात असून, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आवश्यकता पडल्यास कर्ज काढू, पण कोणाचेही पगार थकू देणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी पावसाळ्यात कराड, पाटणसह सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला होता. यादरम्यान मागील वर्षी काही शिल्लक असणाऱ्या 14 कोटींच्या निधीची तरतूद लवकरच करणार असल्याचे, विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावर्षी 15 जुलैपर्यंत NDRF च्या 25 लोकांची टीम जिल्ह्यात तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

कोल्हापूर-3, सांगली- 2, अशा NDRF च्या टीम कार्यान्वित करणार असल्याचं सांगून, 8 नवीन बोटी खरेदीसाठी दीड कोटीचा निधी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंजूर करणार असल्याची ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

(Vijay Wadettiwar meeting with Udayanraje Bhonsle)

संबंधित बातम्या 

Vijay Wadettiwar | कोरोना योद्ध्यांची पगारकपात नाही : मंत्री विजय वडेट्टीवार