नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप

| Updated on: Jun 24, 2021 | 12:03 PM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज सिडको घेराव आंदोलन केले जात आहे.

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : बाळासाहेबांचे नाव देणे हा उद्धव ठाकरेंचा बालहट्ट, त्यांना स्थानिकांबद्दल अजिबात आस्था नाही : भाजप
navi mumbai cidco protest
Follow us on

नवी मुंबई : “नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही, असा घणाघात भाजपने केला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव दिलचं पाहिजे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून ही आमची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज सिडको घेराव आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला मनसेसह भाजप नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. (MNS BJP Support CIDCO Gherao Protest for Navi Mumbai airport naming controversy)

नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील नाव द्या – राजू पाटील

नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव दिलंच पाहिजे, ही स्थानिक भूमिपुत्र म्हणून आमची मुख्य मागणी आहे. पण त्यात काही राजकारणी घोळ घालत आहे. पण आम्ही मात्र यावर ठाम आहोत. सध्या या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पण सरकार घाबरलं की पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवते, असे राजू पाटील म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा आग्रह म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालहट्ट – भाजप 

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बालहट्ट आहे. उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. पण त्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल अजिबात आस्था नाही. भाजप या मुद्द्यावर राजकारण अजिबात करत नाही, परंतु आम्ही स्थानिक भूमीपुत्रांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल किती आस्था आहे हे दिसतयं

अजय चौधरींच्या एका पत्रावर मुख्यमंत्री कॅन्सरग्रस्तांच्या खोल्यांच्या विषयाला स्थगिती देतात, इथे मात्र इतकं मोठं आंदोलन होऊनही लक्ष देत नाहीत. यावरूनच मुख्यमंत्र्यांना स्थानिक भूमीपुत्रांबद्दल किती आस्था आहे हे दिसतं. सध्या जे भूमिपुत्र शिवसेनेत आहेत त्यांना या मुद्द्यावरून दाबलं जातंय. पण ज्यावेळी दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला दिलं जाईल. त्यावेळी सर्वात पहिला गुलाल उधळणारे भूमीपुत्रांमधले शिवसैनिक असतील, असेही रविंद्र चव्हाण म्हणाले.

सरकारला आमची ताकद दाखवू, आंदोलनकर्त्यांचा इशारा

नवी मुंबई पाम बीच रोडवर गाड्यांची ये जा वाढलेली पाहायला मिळतीय. मुंबई, पालघर, विरार, ठाणे वसई या ठिकाणच्या गाड्या गणपतराव तांडेल मैदानाच्या दिशेनं येण्यास सुरवात झाली आहे. आग्री कोळी समाजाला पाठिंबा देण्यासाठी गणेश पाटील आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकारला आज समाजाची ताकत दिसेल, त्यानुळे येत्या काळात सरकारने सावध राहावं असा इशारा त्यांनी दिला आहे.

सिडको घेराव आंदोलन सुरु

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस आहे. विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.

(MNS BJP Support CIDCO Gherao Protest for Navi Mumbai airport naming controversy)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : प्रकल्पग्रस्तांचे सिडको घेराव आंदोलन, दि बा पाटलांच्या समर्थनार्थ झेंडे

Photo : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला, भूमिपुत्रांचं सिडको घेराव आंदोलन