Mahatma Gandhi Jayanti | गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं, तर अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

| Updated on: Oct 02, 2020 | 12:16 PM

राज ठाकरेंनीही गांधी जंयतीनिमित्ताने महात्मा गांधींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. (Raj Thackeray on Mahatma Gandhi Jayanti)

Mahatma Gandhi Jayanti | गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं, तर अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील : राज ठाकरे
Follow us on

मुंबई : भारतात दरवर्षी 2 ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. यंदा गांधीजींची 151 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने देशभरातील राजकारणी, समाजसेवक यांसह विविध स्तरातून त्यांना अभिवादन केले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही गांधी जंयतीनिमित्ताने महात्मा गांधींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Raj Thackeray on Mahatma Gandhi Jayanti)

राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट

“आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींजीना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि एखादी चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयांकडून त्यावर भूमिका घेताना, ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातं.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य असं समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता.

सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं हे सुरु झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. कोरोनाच्या ह्या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील,” असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Raj Thackeray on Mahatma Gandhi Jayanti)

संबंधित बातम्या :

काँग्रेसचा आसूड कडाडणार, ‘शेतकरी-मजूर बचाओ’ आंदोलनाची हाक

अर्वाच्च ओरडणारे आता कुठे आहेत?, हाथरस प्रकरणावरुन राज ठाकरे कडाडले