महाराष्ट्रात एक असं गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस, तुम्हाला या ‘गोल्डन व्हिलेज’ची कहाणी माहिती आहे का?
महाराष्ट्रातील एक गाव असे आहे जिथे आजही सोन्याची नाणी सापडतात. ही ऐतिहासिक नाणी यादव काळातील असल्याचे मानले जाते. आता तुम्ही विचार करत असाल की हे गाव नेमकं कुठं आहे? चला जाणून घेऊया..

आपण अनेक काल्पनिक चित्रपटांमध्ये पाहिले आहे की एखाद्या ठिकाणी सोन्याचा पाऊस पडतो. पण खऱ्या आयुष्यातही असे घडू शकते? यावर तुमचा विश्वास बसेल का? हे ऐकायला जरी एखाद्या काल्पनिक चित्रपटाप्रमाणे वाटत असले तरी देखील पूर्णपणे खरे आहे. तसेच हे ‘गोल्डन व्हिलेज’ म्हणून ओळखले जाणारे गाव महाराष्ट्रातच आहे. तुम्ही देखील ऐकून चकीत झालात ना? जाणून घ्या या गावाविषयी…
ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘कसबा बीड’ या गावाची. या गावाची लोकसंख्या सुमारे ५ ते ६ हजार आहे. येथील मंदिरे, जुने शिलालेख, वीरगळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजही जमिनीतून निघणारी सोन्याची जुनी नाणी ही या छोट्याशा गावाची खरी ओळख आहे.
गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, जसा पावसाळा सुरू होतो आणि मृग नक्षत्र लागतं, तशीच शेता-शिवारात, रस्त्यांच्या कडेला, अगदी घराच्या छतावरही ही प्राचीन सोन्याची नाणी सापडू लागतात. या नाण्यांना ‘सोन्याचे बेडे’ म्हटले जाते आणि ही नाणी यादव काळातील असावीत, असा अंदाज मानला जातो.
कसबा बीडच्या लोकांना आजही सापडतात सोन्याची नाणी
काही दिवसांपूर्वीच गावातील अक्काताई जाधव यांना शेतात काम करताना सोन्याचे एक नाणे सापडले. या नाण्यांवर कमळाची आकृती आणि दुसऱ्या बाजूला काही अक्षरे कोरलेली होती. याचप्रमाणे तानाजी यादव आणि महादेव बिडकर यांनाही वेगवेगळ्या वेळी सोन्याची नाणी (मुद्रा) सापडली आहेत. गावात आणखी एक नाव खूप प्रसिद्ध आहे – मनोहर पाटील. गेल्या पाच-सहा वर्षांत एकट्या त्यांच्या घरात ११ सोन्याची नाणी सापडली आहेत. यातील काही नाणी त्यांनी पाहुण्यांना भेट म्हणूनही दिली, तर उर्वरित नाणी देवाचा आशीर्वाद मानून घरातील देव्हाऱ्यात ठेवली आहेत.
कसबा बीडमध्येच का सापडतात एवढी सोन्याची नाणी?
आता मोठा प्रश्न असा आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ‘कसबा बीड’ याच गावात एवढी सोन्याची नाणी का सापडतात? गावाच्या उत्तर, दक्षिण आणि पश्चिम भागात ही नाणी सर्वाधिक आढळली आहेत. गेल्या पाच वर्षांत इथे जवळपास ५० सोन्याची नाणी सापडली आहेत, सोबतच २१० वीरगळ आणि अनेक जुने शिलालेखही मिळाले आहेत. येथील घरांची रचना देखील एखाद्या प्राचीन स्वतंत्र राज्यासारखी आहे.
