‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची ‘कार्टून’ टीका

Udhhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची टीका

‘साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले, उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर मनसेची कार्टून टीका
| Updated on: Jul 26, 2022 | 2:01 PM

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचं बंड, राज्यात झालेलं सत्तांतर यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली मुलाखत (Udhhav Thackeray Interview) होत आहे. सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut ) ही मुलाखत घेणार आहेत. आज आणि उद्या ही मुलाखत प्रदर्शत होणार आहे. या मुलाखतीवर मनसेच्या वतीने टीका करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक व्यंगचित्र शेअर करत मुलाखतीवर भाष्य केलंय. “साहेब’ जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.  मनसेकडून या मुलाखतीवर सडकून टिका केली जात आहे.  मनसे प्रवक्ते योगेश खैरे यांनीही शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याचं म्हटलंय. शिवाय त्याचे दाखलेही त्यांनी दिलेत.

मनसेची ‘कार्टून’ टीका

संदीप देशपांडे यांनी एक व्यंगचित्र शेअर केलंय. यात मुलाखतीसाठीचा स्टुडिओ दिसतोय. मुलाखतीला सुरुवात करण्याआधी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमधील संवाद दाखवण्यात आला आहे. “हे घ्या साहेबांनी पाठवलेले मुलाखतीसाठीचे प्रश्न आणि उत्तरं”, असं संजय राऊत म्हणतात. “त्यावर बघा आता कशी देतो मी खणखणीत उत्तरं”, असं उद्धव ठाकरे म्हणतात. विशेष म्हणजे या संभाषणावेळी संजय राऊतांच्या हातात घड्याळ आहे. मागच्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे शरद पवार बोलतील तसंच वागत असल्याची टीका होतेय. त्यावर या व्यंगचित्रातून भाष्य करण्यात आलंय.

नेमकं आताच असं का घडलं?

उद्धव ठाकरेंची ही मुलाखत आज प्रसिद्ध होणार आहे. यात संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासात डोकावत अजून एक प्रश्न विचारला. अशा प्रकारची फूट आधी राणे, भुजबळ यांना पाडता आली नाही, आता असं का घडलं? त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना मी अधिकार दिले होते तेव्हा लोक मला तोंडावर बोलत नव्हते. मात्र, बोलायचे की नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे हवं होतं. मी काही खाण्यासाठी गेलो नव्हतो. माझ्याकडे जी खाती ठेवली होती त्यामध्ये सामान्य प्रशासन, न्याय व विधी आणि आयटी. मला खरंच सर्व खात्यांसाठी काहीतरी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल का हा माझा विचार होता. त्यात एका मंत्र्याने दिवे लावले म्हणून त्याचं खातं माझ्याकडे थोडे दिवस ठेवावं लागलं.