एक निर्णय आणि मराठी माणूस ऐतिहासिक क्षणाला मुकला? असं काय घडलं?

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू पाच जुलै रोजी एकत्र येणार का? असे विचारले जात आहे.

एक निर्णय आणि मराठी माणूस ऐतिहासिक क्षणाला मुकला? असं काय घडलं?
uddhav thackeray and raj thackeray
| Updated on: Jun 29, 2025 | 9:36 PM

Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत अशी मराठी माणसाची इच्छा होती. राज यांच्या शिवसेनेतील बंडानंतर मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मोर्चात एकत्र येणार होते. विशेष म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोर्चाची वेगवेगळी तारीख जाहीर केली होती. पण नंतर दोघांनी एकच तारीख जाहीर केली. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने मराठी माणसात उत्साह होता. या मोर्चाची मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकदिलाने जोरात तयारीही सुरू केली होती. मात्र आता सरकारने हिंदी सक्तीविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्यामुळे 5 जुलै रोजीच्या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोर्चा निघण्याची शक्यता मावळली?

येत्या 5 जुलै रोजी होणार हा मोर्चा न भूतो न भविष्यती असा असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कारण काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटासह आंबेडकरी संघटनांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे या महामोर्चाचा सरकारने धसका घेतला आणि हिंदी सक्तीचा जीआरच रद्द केला. परिणामी ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्याची शक्यता मावळली आहे आणि पर्यायाने दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रपणे एकाच मोर्चात पाहण्याची मराठी माणसाची संधीही हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजूनही शक्यता मावळलेली नाही

राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर रद्द केल्यामुळे आता 5 जुलै रोजीच्या मोर्चाचे उद्दीष्ट एका प्रकारे साध्य झाले आहे. पण उद्दीष्ट साध्य झाले असले तरी 5 जुलै रोजी मोर्चा निघेलच, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. फक्त या मोर्चाचे स्वरुप वेगळे असेल असे त्यांनी सांगितले आहे. कदाचित 5 जुलै रोजीचा हा मोर्चा विजयी सभा असेल किंवा विजयी रॅली असेल पण त्यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाला ज्यांनी-ज्यांनी विरोध केला, त्या सर्वांनीच येत्या 5 जुलै रोजी एकत्र यावे, असे जाहीर आवाहन ठाकरेंनी केले आहे.

थेट मनसेचा केला उल्लेख, त्यामुळे…

विशेष म्हणजे त्यांनी यावेळी थेट मनसेचाही उल्लेख केला आहे. मनसेच उल्लेख करून त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाच 5 जुलै रोजीच्या विजयी सभा किंवा रॅलीला हजर राहावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे राज ठाकरे या अप्रत्यक्ष केलेल्या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाच तर दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याचे महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले नसले तरी…

शिवसेना पक्षापासून फारकत घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्टीने कधीच एकत्र आलेले नाहीत. या दोन्ही नेत्यांना अनेक कौटुंबिक कार्यक्रमांत एकत्र पाहण्यात आलं. मात्र राजकीय दृष्टीने ते कधीच एका मंचावर आले नाहीत. दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे टोकाची टीकाही केली. पण आता मुंबई महापालिका आणि एकुणात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेऊन या दोन्ही नेत्यांत जवळीक निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी तयार असल्याचे सांगितले आहे. तसेच राज ठाकरे यांनीही अद्याप या युतीबाबत कोणतेही नकारात्मक भाष्य केलेले नाही. त्यामुळे मोर्चाच्या माध्यमातून जरी हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र आले नसले तरी ते आगामी महापालिकेच्या निवडणुकीत तरी युती करणार का? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आशावाद अजूनही संपलेला नाही

दरम्यान, माझी राज ठाकरे यांच्याशी थेट चर्चा चालू नसली तरी आमची चर्चा मात्र चालू आहे, असे उद्धव ठाकरे यांनी थेट सांगितले आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी जरी हे दोन्ही नेते एकत्र दिसण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असली तरी आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन्ही नेते एकत्र येण्याबाबतचा आशावाद अजूनही संपलेला नाही. या बाबतची सर्व उत्तरं आगामी काळात मिळतीलच.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us