MNS vs NCP : पवार म्हणाले पुस्तकं वाचा, दादा म्हणाले त्यांना महत्व देऊ नका, आता राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणतात

| Updated on: Aug 21, 2021 | 2:06 PM

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

MNS vs NCP : पवार म्हणाले पुस्तकं वाचा, दादा म्हणाले त्यांना महत्व देऊ नका, आता राज ठाकरेंवर सुप्रिया सुळे म्हणतात
supriya sule_raj thackeray
Follow us on

इंदापूर : जातीपातीच्या राजकारणावरुन सध्या मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये (MNS vs NCP) संघर्ष सुरु आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रातील जाती-जातींचं राजकारण वाढल्याचा थेट आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड यांच्याकडून मनसेवर हल्लाबोल करण्यात आला. त्यावर मनसेकडूनही संदीप देशपांडे, वसंत मोरे आणि स्वत: राज ठाकरे यांनी पलटवार केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज ठाकरेंनी आरोप केला आहे की राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला, यावर आपली प्रतिक्रिया काय असा सवाल सुप्रिया सुळे यांना इंदापुरात विचारण्यात आला. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “हे दडपशाहीचं सरकार नाही. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा बोलण्यान ते काय खरं होत नाही”

राज ठाकरे काय म्हणाले होते?

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असं राज म्हणाले होते.

शरद पवार काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.

संभाजी ब्रिगेडचा आक्रमक पवित्रा

शरद पवारांनीही राज ठाकरेंना प्रबोधनकारांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिल्यानंतर, संभाजी ब्रिगेडने थेट कृती करण्यास सुरुवात केली आहे. आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत.

राज ठाकरेंचा पलटवार

दरम्यान, शरद पवारांच्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी 20 ऑगस्टला पुणे दौऱ्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिलं. ‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, असं राज ठाकरे म्हणाले. आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचं लिखाण आपल्याला हवं तसं घ्यायचं असं चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावलाय.

अजित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला अजितदादांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.

संबंधित बातम्या 

‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’, राज ठाकरेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर

Amol Mitkari | अपयशी नेत्याला काय उत्तर देणार, राज ठाकरेंना मिटकरींचं उत्तर

शरद पवार म्हणाले, प्रबोधनकारांचं लिखाण वाचा, आता संभाजी ब्रिगेड राज ठाकरेंना आजोबांची पुस्तकं पाठवणार