ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश

| Updated on: Jan 15, 2021 | 8:24 PM

राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. (mns will contest gram panchayat election in maharashtra)

ग्रामपंचायत निवडणूक पूर्ण ताकदीने लढा, राज ठाकरेंचे जिल्हाध्यक्षांना आदेश
Follow us on

मुंबई: राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार उभे करा, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे मनसेही या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (mns will contest gram panchayat election in maharashtra)

राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मनसेही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत येणार असल्याचं बोललं जात आहे.

किती जागा लढवायच्या हे स्थानिक नेतृत्व ठरवेल: सरदेसाई

आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढवणार आहोत. त्यासाठी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. किती जागा लढवायच्या हे अजून ठरलेलं नाही. मात्र, स्थानिक नेतृत्व परिस्थिती पाहून निर्णय घेतील, असं मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितलं. मनसे हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसेची ताकद अधोरेखित होईल, असंही ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे हे ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार करणार की नाही हे अद्याप ठरलेलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेची मतं खाण्यासाठी मनसे मैदानात

दरम्यान, मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे राजकीय अर्थही काढले जाऊ लागले आहेत. शिवसेनेच्या व्होटबँकेला छेद देण्यासाठी मनसे मैदानात उतरत असल्याचं बोललं जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या काही मतांनी विजय होत असतो. मनसेने प्रत्येक मतदारसंघात शे दोनशे मतं घेतली तरी त्याचा शिवसेनेला मोठा फटका बसून भाजपला फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगत आहेत.

पदवीधर निवडणुकांमधील विजयाची पुनरावृत्ती होणार?

दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी एकत्रितपणे ग्रामपंचायत निवडणुकीत उतरल्यास भाजपचा खेळ खराब होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्रित लढल्याने महाविकास आघाडीला जसं यश मिळालं तसंच यश महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत मिळू शकतं, असंही बोललं जात आहे.

15 जानेवारीला मतदान

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान; तर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234. (mns will contest gram panchayat election in maharashtra)

 

संबंधित बातम्या:

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

(mns will contest gram panchayat election in maharashtra)