पाच मुद्दे मांडत चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना एकच सवाल; मूग गिळून गप्प का?

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर घणाघात; पाच मुद्दे मांडत विचारला तो एकच सवाल

पाच मुद्दे मांडत चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांना एकच सवाल; मूग गिळून गप्प का?
| Updated on: Jul 18, 2023 | 1:00 PM

मुंबई | 18 जुलै 2023 : आज देशात दोन मोठ्या बैठका होत आहेत. दिल्लीत एनडीएची बैठक होतेय. तर बंगळुरुमध्ये विरोधकांची बैठक होत आहे. बंगळुरुतील विरोधकांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत रणनिती ठरवण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे या बैठकीला गेल्यामुळे भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. एक ट्विट करत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना एक प्रश्न विचारला आहे की, तुम्ही मूग गिळून गप्प का? हीच ती वेळ!, असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर घणाघात केला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचं ट्विट जसंच्या तसं….

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना विरोध करण्याचा “समान किमान कार्यक्रम” घेऊन बंगरुळूमध्ये गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आज आली आहे. हीच ती वेळ!

उद्धवजी, ज्या ठिकाणी तुमच्या हजेरीत विरोधकांची ही बैठक होत आहे, तिथे हिंदू विरोधासाठी, हिंदू मनोधर्य खच्चीकरणासाठी सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार टपून आहे.

1. भाजपाने सरकार असताना मंजूर केलेला” धर्मांतर विरोधी कायदा” नव्या काँग्रेस सरकारने रद्द केला.
तुम्ही मूग गिळून गप्प बसले.!

2. कर्नाटक मंत्रिमंडळाने यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
तुम्ही गप्प बसले!

3. ज्या ठिकाणी ही बैठक होत आहे, तिथे राष्ट्रएकतेच्या विचारांवर घाला घालण्यात येत आहे.
तुम्ही सहभागी झाले!

4. उद्धवजी, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचे पाईक आहोत, असे सांगणारे तुम्ही यावर काही बोलणार आहात की नाही?
की, मूग गिळून बसणार?

5. कोर्टाच्या निर्णयापर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश जाहीर करा,अशी मागणी विधान परिषदेत करणारे तुम्ही या बैठकीत सीमाप्रश्न मांडणार आहात की नाही? भूमिका घेणार आहात की नाही?की, फक्त महाराष्ट्रात “टोमणे” मारणार, हात वर करून भाषणबाजी करणार आहात?
की, पुन्हा मूग गिळून बसणार?