राज ठाकरे यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले उद्धव ठाकरे..

| Updated on: Mar 23, 2023 | 1:52 PM

उद्धव ठाकरे यांनी दोन महत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देऊन मोठे संकेत दिले आहे. राज ठाकरे यांच्यावर टीकेवर उत्तर दिले असून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय बोलणं झालं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले उद्धव ठाकरे..
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : गुढी पाडव्याच्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आज विधीमंडळात प्रवेश करत असतांना कधीकाळी राजकीय मित्र असलेले आणि आत्ताचे विरोधक उद्धव ठाकरे यांचा संवाद झाला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांची या दोन्ही विषयी काय प्रतिक्रिया असणार याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या टीकेला कोणते प्रत्युत्तर देणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. त्यात विधानपरिषदेत सुधीत मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्ष ऑफर दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया नेमकी काय असते यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती.

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या टीकवर फार काही जहरी टीका केली नसली तरी टोला मात्र लगावला आहे. राज ठाकरे यांनी खरंतर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत उद्धव ठाकरे यांनाच सगळं हवं होतं, लोकं जावे यासाठी ते स्वतःच प्रयत्न करत होते असे विविध आरोप केले होते.

त्यावरून उद्धव ठाकरे म्हणाले जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी वाचली असेल असा टोलाच उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. मी यापूर्वीच म्हंटलं आहे. एकच कॅसेट घासून पुसून लावायचे काम ते करतात त्यामुळे नवीन नाही, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत मी हे सर्व बोललो आहे असं राज ठाकरे यांच्या टीकेवर उद्धव ठाकरे बोलले आहे.

हे सुद्धा वाचा

याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि मी एकाच वेळी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरून प्रवेश केला. यामध्ये फक्त हाय आणि हॅलो इतकेच झाले. कुठलीही चर्चा अशी खुली होत नाही, आता बंद दाराआड चर्चा होतात. त्यामुळे भविष्यात काही बंद दाराआड चर्चा झालीच तर बोलू असे उद्धव ठाकरे म्हणाले आहे.

याच वेळी नरेंद्र मोदी यांचा एक विरोध कमी करण्यासाठी काही पुढे चर्चा होऊ शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरून अशा कुठल्याही चर्चा करू नका तसा अर्थ काढू नका म्हणत उद्धव ठाकरे यांनी भविष्यात भाजपसोबत जाणार की नाही याबाबत एक संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात भाजपसोबत चर्चा होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले तर नाही ना अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे पुढील काळात राज्याच्या राजकारणात काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.