Sanjay Raut| उद्धव ठाकरेंची आजची सभा क्रांतिकारी! इथे टोमणे नव्हे, थेट फटकारे! शिवसेनेच्या निशाण्यावर कोण? राऊतांनी सांगितलं…

| Updated on: May 14, 2022 | 1:59 PM

तुम्ही टोमणे म्हणतात. त्याला आम्ही फटकारे म्हणतो. प्रत्येकाच्या भाषणाची कसब आणि कला असते. बाळासाहेब ठाकरेंची ठाकरी भाषा होती. मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा इतिहास विरोधकांना माहितीच नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.

Sanjay Raut| उद्धव ठाकरेंची आजची सभा क्रांतिकारी! इथे टोमणे नव्हे, थेट फटकारे! शिवसेनेच्या निशाण्यावर कोण? राऊतांनी सांगितलं...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विराट सभा पार पडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उचलून धरलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) भाजपनं दिलेलं आव्हान यामुळे महराष्ट्रातील वातावरण संवेदनशील झालंय. आता उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेतात, विरोधकांची कोणत्या शब्दात कानउघडणी केली जाईल, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राजकीय सभा असो की पक्षाची भूमिका, शिवसेनेसाठी नेहमीच मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले संजय राऊत यांना याबद्दल विचारलं असता, त्यांनी आजची सभा ही ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असेल, असं सांगितलं. राज्यातलं वातावरण विरोधकांनी गढूळ केलं आहे. भ्रष्ट केलं आहे. विरोधकांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या एकात्मते्चया पायावर हल्ले करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व प्रश्नांवर उद्धवजी परखडपणे बोलतील अशी अपेक्षा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हिंदुत्वावरून दिलेल्या आव्हानाला उत्तर देणार?

महाविकास आघाडीसोबत गेल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर नेहमीच संशय घेण्यात आला आहे. आता तर हिंदुत्वावरूनच राजकारण सुरु झालं आहे. यावर विरोधकांना उत्तर देणार का, असा सवाल जनतेच्या मनात आहे. यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेला कधीही अग्निपरीक्षा द्यावी लागली नाही. शिवसेना 30 वर्षांपासून हिंदुत्वावरच बोलतेय . बाकीचे हे सगळे टेंपररी आहेत. त्यामुळे वारंवार सर्टिफिकेट दाखवायची गरज नाही., असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘प्रश्न उभे कऱणारे वैफल्यग्रस्त’

शिवसेनेच्या भूमिकांवर वारंवार प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, जे प्रश्न उभे करतायत ते वैफल्यग्रस्त आहेत. अपयशामुळे ते असं वागतायत. सत्ताधाऱ्यांवर बेछूट आरोप करत आहेत. शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत. इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले करतायत. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री यावर निश्चित भाष्य करतील, संजय राऊत यांनी सांगितलं.

शिवसेना खुलासा करणार की टीका ?

आजच्या सभेत शिवसेना आरोपांबाबत खुलासे करणार की टीका करणार हा प्रश्न लोकांच्या मनात आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना आपल्या चालीनं चालते. भूमिकेच्या दिशेने चालते. कुणी सोमा-गोमा उठला. आरोप केले. सरकारला अस्थिर करायचं आणि मग भोंगे, हनुमान चालिसा हे विषय काढायचे. महागाई, बेरोजगारी हे अत्यंत गंभीर विषय आहेत. विकासाच्या मुद्दयावर विरोधक बोलत नाहीत. नरेंद्र मोदींचं सरकार ज्या पद्धतीनं कोसळतंय, त्याकडे कुणाचं लक्ष नाही. आम्हाला भ्रष्टाचार मुक्त शासन द्यायचंय, आधीच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा चिखल साफ करायला गेलो की असे मुद्दे काढून भ्रम निर्माण केला जातोय, असा आरोप राऊत यांनी केला.

औरंगजेबाच्या कबर भाजप का काढत नाही?

औरंगाबादमधील औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे, अशी मागणी केली जातेय. यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ही मागणी आम्हालाच का करताय? भाजपदेखील पाच वर्षे सत्तेत होती. ही वास्तू तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे हे काम केंद्र सरकारनेच करावे…

‘हटके आणि फटके सभा’

आजची उद्धव ठाकरे यांची सभा हटके आणि फटके सभा असेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मराठी भाषा ही समृद्ध आहे. तुम्ही टोमणे म्हणतात. त्याला आम्ही फटकारे म्हणतो. प्रत्येकाच्या भाषणाची कसब आणि कला असते. बाळासाहेब ठाकरेंची ठाकरी भाषा होती. मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा इतिहास विरोधकांना माहितीच नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.