‘जनतेचा आवाज दाबता येत नसतो’, मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

| Updated on: Oct 03, 2021 | 3:14 PM

रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन काल भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाजपनं केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

जनतेचा आवाज दाबता येत नसतो, मुंबई, ठाण्यातील खड्ड्यांच्या राजकारणावरुन चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील खड्ड्यांवरुन राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन काल भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भाजपनं केलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या मारहाणीचा निषेध व्यक्त केलाय. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. (Chandrakant Patil criticizes Shivsena over potholes on roads in Mumbai and Thane)

‘मुंबई आणि ठाणे महानगरपालिका प्रशासन बुजवलेल्या खड्ड्यांचे केवळ आकडे नाचवत असले तरीही प्रत्यक्षात मात्र रस्त्यांच्या चाळणीमुळे प्रवाशांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. याविरोधात उठणारा आवाज दाबण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही जनतेचा आवाज दाबता येत नसतो! डांबरीकरणानंतर केवळ 12 तासांत पुन्हा खड्डे पडले तेव्हा ठाणे महानगरपालिकेने कंत्राटदारांना अभय देत चार अभियंत्यांना बडतर्फ केले. महानगरपालिका आणि कंत्राटदार यांच्यातील या सहसंबंधांमुळेच चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्याचा प्रकार शिवसेनेने आरंभला आहे’, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केलीय.

जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम

‘गेल्या 24 वर्षांत मुंबई महानगरपालिकेने रस्ते आणि खड्डे यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल 21 हजार कोटी खर्च केले आहेत आणि तरीही प्रवाशांचे दरवर्षी तेच हाल होत आहेत. कारण महानगरपालिकेतील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने जनतेच्या करातून आलेल्या निधीला खड्डा पाडण्याचे काम सुरु आहे. अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असल्यामुळेच मुंबई महानगरपालिका जरी तब्बल 42 हजार खड्डे भरल्याचा दावा करत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र हे खड्डे भरलेच गेले नाहीत किंवा झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. हिंदमाता पुलावरील खड्डे एका दिवसात जैसे थे होतात, यातून हेच स्पष्ट होते’, असा घणाघात पाटील यांनी केलाय.

नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल

‘दोन्हीही महानगरपालिका प्रशासनाकडून अनेकदा झालेल्या अमुक दिवसांत खड्डे भरू अशा पोकळ गर्जना हा कर्तव्य चोख बजावत असल्याचा आव आणून आजचे मरण उद्यावर ढकलण्याचा प्रकार झाला आहे. मुंबई-ठाण्यातील नागरिकांना या त्रासातून मुक्त करा, नाहीतर जनता येत्या निवडणुकीत योग्य तो धडा शिकवेल’, असा इशाराही पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

इतर बातम्या : 

West Bengal By-Poll : भवानीपूरमधून ममता बॅनर्जींचा विक्रमी मतांनी विजय, भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा पराभव

Photo : अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांचा टाहो सरकार कधी ऐकणार?

Chandrakant Patil criticizes Shivsena over potholes on roads in Mumbai and Thane