मुंबई : देशात पाच राज्यांमध्ये निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पाच राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने केलेल्या तयारीवर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस तयार आहे. यावेळी परिवर्तनाची लहर दिसेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष्य केलं.
“केंद्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे ते कोणाच्याही विरोधात ईडी, सीबीआय लावू शकतात. आम्ही लोकशाहीला मानतो. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पूर्ण ताकदीने तयार आहे. परिवर्तनाची लहर आली आहे. मूळ मुद्द्याला बाजूला सारण्यासाठी नौटंकी केली जात आहे. हे लोकांच्या लक्षात आलं आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मुद्दामहून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरु आहे. देशातील लोकांना भाजप नौटंकीबाज आहे, हे समजलं आहे. या निवडणुकीत परिवर्तन झालेलं पाहायला मिळेल,” असं पटोले म्हणले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर विशाणा साधला. “निवडणूक आयोग कोणाचं आहे हे आता स्पष्ट झालं आहे. राज्यामध्ये नगर पंचायतीच्या निवडणुका तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होता. त्यामध्ये राज्य सरकारने ओबीसी आरक्षण आणि कोरोनाची स्थिती हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतंय यावर चर्चा करणं गरजेचं आहे,” असे पटोले म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केल्या जात असलेल्या टीका-टिप्पणीवरही नाना पटोले यांनी भाष्य केलं. महिलांविषयी बोलणं गैर आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नींविषयी जे बोललं गेलं त्याचाही आम्ही धिक्कार करतो. महिलांविषयीची चर्चा तसेच जे बोलले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असं पटोले म्हणाले.
इतर बातम्या :