‘संजय राऊत काय घेऊन बोलतात माहिती नाही’, नारायण राणेंचा घणाघात

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

संजय राऊत काय घेऊन बोलतात माहिती नाही, नारायण राणेंचा घणाघात
केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 6:28 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा दावाही त्यांनी केलाय. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय. (Narayan Rane criticizes ShivSena MP Sanjay Raut)

संजय राऊत यांनी हे सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल असं वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊतांनी एकदा तर 25 वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर खोचक टीका केलीय. तसंच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत, असं सूचक वक्तव्यही राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असंही राणे म्हणाले.

‘मुंबई महापालिकेबाबत कुठलिही जबाबदारी नाही’

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विचारलं असता राज्यानं त्यांचे कर कमी करावेत. जेणेकरुन त्यांचे दर कमी येतील, असं राणे म्हणाले. हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. त्यासाठी एक महिना, दोन महिने असा वेळ मी देणार नसल्याचं राणे म्हणाले. मुंबई महापालिकेबाबत मला कुठलिही जबाबदारी देण्यात आलेली नाही, असंही राणेंनी स्पष्ट केलंय.

‘सरकार 5 वर्षे टिकणार हे सातत्याने बोलावं का लागतं?’

जो माणूस आपलं पाप लपवायला बघतो. आपल्या पापांवर पांघरुण घालण्यासाठी दिखावूपणे का होईना पण बोलावं लागतो. संजय राऊतही तेच करतात. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मतं मिळवायची आणि जिंकून आल्यावर दुसरीकडे जायचं. तुमचं सरकार पाच वर्षे टिकणार असेल तर तुम्हाला सतत बोलावं का लागतं. सरकार पाच वर्षे टिकणार हे सांगणं म्हणजे आपला दुबळेपणा लपवण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही दुबळे आहात, त्यापासून पळण्याचा प्रयत्न म्हणजेच राऊतांचं वक्तव्य असल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंमध्ये दीड तास चर्चा

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. गणेशोत्सव सुरू आहे. उद्या विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणपतीचं दर्शन घेतलं. थोड्यावेळ गप्पा मारल्या. गणपती सुद्धा राजकारण्यांचा गुरू आहे. राजकारण्यांनी गणपतीकडून अनेक गोष्टी शिकव्यात. मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली, काय बोललो… या चर्चा आतमध्ये. त्या बाहेर कशाला सांगायच्या?, असं राऊत म्हणाले.

कमालीची शांतता आहे, कोणतंही वादळ नाही

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानाचे तीन पक्षात पडसाद उमटले आहेत का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर पडसाद वगैरे काही नाही. सर्व काही शांत आहे. अलबेल आहे. कोणतंही वादळ नाही. कमालीची शांतता आहे. त्या विधानाने कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर फुटू द्या. पण हे सरकार तीन वर्ष चालणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

‘मातोश्री’ समोरच पूल कोसळला, अपयश लपवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं ते विधान; नितेश राणेंची टीका

‘पवारांना ठाकरेंवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही, त्यांच्यावर जनताच नाराज’, मुनगंटीवारांचा जोरदार टोला

Narayan Rane criticizes ShivSena MP Sanjay Raut

Follow Us