ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे

| Updated on: Jun 11, 2020 | 1:28 PM

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे
Follow us on

सिंधुदुर्ग : फक्त फेरफटका मारुन होत नाही, राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे, लोकल सुरु करुन काय करणार? असं विचारत राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं राणे म्हणाले. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

“निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी” अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

“सिंधुदुर्गाला 25 कोटीची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही” असा प्रहारही राणेंनी केला. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने कमी करुन दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.

सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवासाचं अधिवेशन बोलावायला हवं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षाला सामोरं जायला जी ताकद लागते, ती सत्तारुढ पक्षामध्ये नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली.