युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार

| Updated on: Dec 05, 2019 | 8:03 AM

पुण्यात पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक यांच्या वार्षिक संमेलनाला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत.

युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार
Follow us on

मुंबई : शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकमेकांसमोर येणार आहेत. येत्या शनिवारी, म्हणजेच सात डिसेंबरला पुण्यात ही भेट (Narendra Modi to meet Uddhav Thackeray) होणार आहे.

पुण्यात पोलिस महासंचालक (DGs) आणि महानिरीक्षक (IGs) यांचं वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहेत.

सेना-भाजप युतीमध्ये असताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘धाकटा भाऊ’ असा केला आहे. परंतु,  अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन भाजपशी बिनसल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जाताना दिसत नाही.

युतीची फाटाफूट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. परंतु मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता विरोधीपक्ष नेतेपदाची कमान सांभाळणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात बोलताना एकमेकांशी सौहार्दपूर्ण नातं कायम राखण्याची ग्वाही दिली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर का गेले नाही? भाजपचा सवाल

अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे शिवसेना-भाजप यांचं नातं फिस्कटल्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. भाजपने शिवसेनेला एनडीएतून बाहेरचा रस्ताही दाखवला. इतकंच नाही, तर संसदेच्या दोन्ही सभागृहात शिवसेना खासदारांची विरोधीपक्षाच्या बाकांवर सोय करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर नरेंद्र मोदींनी फोनवरुन शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच दौऱ्यावर (Narendra Modi to meet Uddhav Thackeray) येणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.