महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी गणेश नाईकांची समर्थक नगरसेवकांसह खलबतं

| Updated on: Jun 17, 2022 | 9:21 PM

महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांनी आपले समर्थक असलेल्या सर्व भाजप नगरसेवकांबरोबर बोनकोडे येथील 'क्रिस्टल हाऊस'मध्ये गुप्त बैठक घेतली

महाविकास आघाडीचा रथ रोखण्यासाठी गणेश नाईकांची समर्थक नगरसेवकांसह खलबतं
Follow us on

नवी मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचं महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांची नजर आता नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवर आहे. नवी मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे. राष्ट्रवादीचा हात सोडून भाजपवासी झालेल्या गणेश नाईकांसमोर (Navi Mumbai Ganesh Naik Meeting) आता महाविकास आघाडीचा रथ रोखण्याचं आव्हान आहे.

विधानसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी नवी मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. पण राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक वगळता इतर सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन गणेश नाईक सहकुटुंब भाजपमध्ये दाखल झाले आणि सोबतच नवी मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला.

एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी भाजपच्या गोटातून सत्ता खेचून आणण्यासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे नाईकांनी गड राखण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

गणेश नाईकांचं समर्थक नगरसेवकांना स्नेहभोजन, नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपला धक्का?

महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजपवासी झालेल्या गणेश नाईक यांनी आपले समर्थक असलेल्या सर्व भाजप नगरसेवकांबरोबर बोनकोडे येथील ‘क्रिस्टल हाऊस’मध्ये गुप्त बैठक घेतली. या बैठकीला संजीव नाईक, संदीप नाईक, सागर नाईक आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांबरोबर शहर भाजपचे काही मोजके पदाधिकारी हजर होते. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेत सत्तेवर स्वार होण्यासाठी सर्व पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईतही यशस्वी झाला, तर महापालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता धूसर होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष होऊन पालिका निवडणूक लढवण्याची मागणी नाईक सर्मथकांनी उचलून धरली आहे.

गणेश नाईक यांचं वर्चस्व

गणेश नाईक हा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे. नुकताच गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनीही भाजपात प्रवेश केला. नवी मुंबई महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली आहे.

गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली. Navi Mumbai Ganesh Naik Meeting