मधुकर पिचड यांचा धुव्वा, 28 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; साखर कारख्यान्याच्या निवडणुकीचा निकाल काय?

| Updated on: Sep 26, 2022 | 4:41 PM

जेष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि मुलगा वैभव पिचड यांनाही कारखाना निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

मधुकर पिचड यांचा धुव्वा, 28 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; साखर कारख्यान्याच्या निवडणुकीचा निकाल काय?
पिचडांच्या वर्चस्वाला धक्का, साखर कारख्यान्यातील सत्तेला मोठा सुरुंग
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज गाडेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नगर: भाजप नेते मधुकरराव पिचड (madhukar pichad) यांना विरोधकांनी आणखी एक धक्का दिलाय. 28 वर्षांपासून सत्ता असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर विरोधकांनी झेंडा फडकावला आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकीनंतर अकोलेत भाजपची (bjp) मात्र मोठी पिछेहाट होताना दिसतेय. राजूर गावच्या ग्रामपंचायतीत 40 वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावल्यानंतर आता महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांना आसमान दाखवलंय.

मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीने अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर घवघवीत यश मिळविले आहे. अकोले तालुक्यातील जनतेने पिचड यांचे पॅनल शंभर टक्के नाकारले असून हा विजय राष्ट्रवादीचा आहे. हा विजय शरद पवारांच्या विचारांचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.

अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. या निवडणुकीत कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर, कैलास वाकचौरे, अशोकराव भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने 21 – 0 ने पिचड पॅनेलचा धुव्वा उडवला. जवळपास 28 वर्षे मधुकरराव पिचड यांची एकहाती सत्ता असलेल्या या कारखान्यावर राष्ट्रवादीने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, मधुकर पिचड हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेल्यानंतरचा हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवामुळे पिचड यांच्या राजकीय वर्चस्वालाच धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालूक्याचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचा बालेकिल्ला होता. मात्र 2019 ला शरद पवारांची साथ सोडून भाजपात दाखल झालेल्या पिचडांना एकामागून एक धक्के देत त्यांची सत्ताकेंद्रे विरोधक ताब्यात घेताना दिसताहेत. मुलगा वैभव पिचड याचा आमदारकीत पराभव, त्यानंतर 40 वर्षापासून सत्ता असलेल्या राजूर ग्रामपंचायतमध्ये पराभव आणि आता 28 वर्षापासून सत्ता असलेल्या अगस्ती साखर कारखान्यावर विरोधकांनी झेंडा फडकावलाय.

जेष्ठ नेते मधुकरराव पिचड आणि मुलगा वैभव पिचड यांनाही कारखाना निवडणूकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 21 जागांसाठी होत असलेल्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच पिचड विरोधी असलेल्या शेतकरी समृद्धी मंडळाने आघाडी घेतली आणि सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवत कारखान्यावर झेंडा फडकावलाय, असं राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी सांगितलं.

ग्रामपंचायत नंतर साखर कारखान्याचीही सत्ता गमावल्याने मधुकरराव पिचड यांना मोठा धक्का बसला आहे.आता मार्केट कमिटी आणि दुध संघावर असलेली सत्ताही काबीज करण्याच्या विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी माहिती समृद्धी मंडळाचे सिताराम गायकर यांनी दिली.

अकोलेत महाविकास आघाडीचा पँटर्न यशस्वी ठरलाय. त्यामुळे आगामी मनपा, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणुका लढवल्या तर शिंदे – फडणवीस सरकारला मोठी डोकेदुखी ठरेल एवढ मात्र नक्की.