प्रत्येक गोष्टीची जबाबदारी लोकांवर ढकलता, मग ठाकरे सरकार गोट्या खेळायला बसलंय का?: निलेश राणे

| Updated on: Nov 21, 2020 | 10:33 AM

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. | Nilesh Rane attacks on Kishori Pednekar

प्रत्येक गोष्टीची जबाबदारी लोकांवर ढकलता, मग ठाकरे सरकार गोट्या खेळायला बसलंय का?: निलेश राणे
Follow us on

मुंबई: दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली, या शिवसेना (Shiv sena) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वादात आता निलेश राणे यांनीही उडी घेतली आहे. शिवसेनेत सगळेच एकापेक्षा एक विद्वान असल्याचा टोला त्यांनी लगावला. सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. (Nilesh Rane slams Shivsena leader Kishori Pednekar)

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी शाळा आणि लोकल ट्रेन इतक्यात सुरु करू नयेत, असे सांगितले होते. तसेच दिवाळीत प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी ट्विट करुन राज्य सरकारला धारेवर धरले. अगोदर माझं कुटुंब माझी जबाबदारी, आता माझं लाईट बिल माझी जबाबदारी. ठाकरे सरकार सुधरणार नाही. प्रत्येक गोष्ट लोकांची जबाबदारी तर ठाकरे सरकार काय गोट्या खेळायला बसलंय काय, असा सवाल निलेश राणे यांनी विचारला.

तत्पूर्वी भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेला लक्ष्य केले होते. दारुची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट राज्य सरकारने केव्हाच उघडली आहेत. पण रुग्ण मात्र चार दिवसांपूर्वी उघडलेल्या मंदिरामुळे वाढले, हे महापौरांचे तर्कट आहे. हा तर्क नाही शिवसेनेचा खरा चेहरा आहे”, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला होता.

किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली, असे वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केले. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. कोरोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल, अशी भीती महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.

दिवाळीनंतर राज्याच्या काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे, असे मत व्यक्त केले. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहीमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या:

दारुच्या दुकानांमुळे नाही तर मंदिरं उघडल्यामुळे रुग्ण वाढले, महारापौरांचा तर्कट, हा शिवसेनेचा खरा चेहरा : अतुल भातखळकर

(Nilesh Rane slams Shivsena leader Kishori Pednekar)