Nitin Gadkari : ‘पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य, बायकोलाही विश्वास बसला नाही, पण…’ नितीन गडकरींनी सांगितला किस्सा आणि व्हिजन

| Updated on: Jun 17, 2022 | 6:31 PM

पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात गाड्या, कारखाने आणि विमान हायड्रोजनवर चालणार. मी सांगत असल्याचा बायकोलाही विश्वास बसत नव्हता. म्हणून हायड्रोजनवर गाडी चालवून दाखवली, असंही गडकरींनी सांगितलं.

Nitin Gadkari : पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य, बायकोलाही विश्वास बसला नाही, पण... नितीन गडकरींनी सांगितला किस्सा आणि व्हिजन
नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
Image Credit source: TV9
Follow us on

अकोला : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या इनोव्हेटिव्ह आयडिया आणि कार्यतत्परतेमुळे देशभरात ओळखले जातात. गडकरींच्या खात्याचं काम आज देशभरात पाहायला मिळतं. आपल्या खात्या व्यतिरिक्त अन्य विषयांमध्येही गडकरींचा अभ्यास आणि ज्ञान अफाट असतं. आज अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी असाच एक नवीन प्रयोग जनतेसमोर मांडलाय. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन (Hydrogen) वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात गाड्या, कारखाने आणि विमान हायड्रोजनवर चालणार. मी सांगत असल्याचा बायकोलाही विश्वास बसत नव्हता. म्हणून हायड्रोजनवर गाडी चालवून दाखवली, असंही गडकरींनी सांगितलं. गडकरी यांच्या उपस्थित ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचा 82 वा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. यावेळी आदिवासी समाजासाठी पिचडांनी केलेल्या कामाचे कौतुक त्यांनी केलं. तसंच शेतकरी, आदिवासी यांच्या जिवनात आर्थिक स्थेर्य मिळून देण्यासाठी भविष्यात नविन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे गरजेचे असल्याचंही गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी म्हणाले की, पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळं करता येणं शक्य आहे. भविष्यात गाड्या, कारखाने आणि विमान हायड्रोजनवर चालणार. मी हे सांगत असल्याचा विश्वास बायकोलाही बसत नव्हता. म्हणून मी हायड्रोजन गाडी चालवून दाखवली. मी बोलतो ते करतोच. भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी येणार. शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाताही बनायला हवा. आता आपला दृष्टीकोन भविष्याच्या दृष्टीने बदलावा लागेल. तरुणांनी पुढाकार घेऊन हे काम करणं गरजेचं आहे, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

‘कोणताही माणूस जातीपेक्षा त्याचा कार्याने मोठा होतो’

मला 18 वर्षे महाराष्ट्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या अनेक नेत्यांशी माझा चांगला संबंध आहे. गोरगरीब, आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या मधुकर पिचड यांच्याशी चांगले संबंध आले. पिचडसाहेब म्हणजे आदिवासींच्या प्रश्नासाठी कायम लढा देणारं नेतृत्व. आपल्या समाजाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं. जो समाज शोषीत, पीडित आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम पिचड यांनी केलं. महाराष्ट्रात आदिवासींसाठी काम करणाऱ्या नेत्यांमध्ये पिचड अग्रस्थानी आहेत. पिचड साहेबांशी असलेल्या प्रेमाच्या संबंधांमुळे आज मी कार्यक्रमाला आलोय. कोणताही माणूस जातीपेक्षा त्याचा कार्याने मोठा होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या जातीचे नेते नाहीत. येणाऱ्या काळात जातीविरहीत समाजव्यवस्था उभं करण्यांचं आव्हान आपल्यासमोर आहे. ज्याला घरी खायला अन्न नाही. त्याला रोटी, कपडा, मकान जोवर मिळत नाही तोवर ते शक्य नाही, असं गडकरी यावेळी म्हणाले.

’13 वर्षापासून साखर कारखाना चालवतोय, खूप कस निघाला’

शेतकरी प्रश्नावरही गडकरी यांनी आपलं मत व्यक्त केलं. ऊस हा शेतकऱ्यांच्या प्रगतीचं मापदंड बनला आहे. आज गहू स्वस्त पण ब्रेड महाग झालाय. साखर 32 रुपयांपेक्षा कमी दराने विकायची नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यावर्षी देशातील साखरेचं उत्पादन जास्त आहे. 1 हजार 320 लाख टन साखर तयार झालीय. देशातील गरज केवळ 280 लाख टनाची आहे. आता केवळ साखर बनवण्याऐवजी वेगळा विचार करावा लागेल. मी 13 वर्षापासून साखर कारखाना चालवतोय, खूप कस निघाला. यावर्षी कारखाना नफ्यात आलाय, असंही गडकरींनी सांगितलं.

शिर्डी ते नगर महामार्गासाठी लवकरच रिटेंडर

शिर्डी ते नगर महामार्गाचे काम ठप्प आहे. महाराष्ट्रातील हरित लावादाने माती उचलण्याची परवानगी दिली नसल्याने काम कस करणार असा प्रश्न आहे. तुम्ही अपिलात जावे असा सल्ला देताना सदर ठेका टर्मिनेट करण्यात आला असून लवकरच रिटेंडर होईल, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिलीय.