धनंजय मुंडे, पंकजाताई सोडा, तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत : मुख्यमंत्री

| Updated on: Aug 26, 2019 | 9:56 PM

धनंजय मुंडे यांना चर्चेसाठी मी स्वतः, पंकजाताई किंवा खासदार प्रीतमताई यांची गरज नाही, त्यांना आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis Beed) धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीडमध्ये महाजनादेश यात्रेतील सभेत ते बोलत होते.

धनंजय मुंडे, पंकजाताई सोडा, तुम्हाला आमचे सुरेश धसच पुरेसे आहेत : मुख्यमंत्री
Follow us on

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Beed) हे खोटे आकडे सांगतात, त्यांनी एकदा जाहीर चर्चेला यावं, असं आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं होतं. पण धनंजय मुंडे यांना चर्चेसाठी मी स्वतः, पंकजाताई किंवा खासदार प्रीतमताई यांची गरज नाही, त्यांना आमचे आमदार सुरेश धसच पुरेसे आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis Beed) धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीडमध्ये महाजनादेश यात्रेतील सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत बीडमध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. जनतेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली, शिवाय आपले बीड जिल्ह्यातील आमदार निवडून तर येणारच आहेत, पण राष्ट्रवादीची अवस्था अशी करा, की त्यांच्या तिकिटावरही पुन्हा कुणी निवडणूक लढवली नाही पाहिजे, असं म्हणत त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला.

विकासाचे खोटे आकडे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असं धनंजय मुंडे म्हणाले आणि त्यांनी जाहीर चर्चेचं आव्हान दिलं. पण धनंजय मुंडे यांना सांगायचंय की राज्याच्या मुख्यमंत्र्याने दिलेले आकडे कधीही खोटे नसतात हा इतिहास आहे. त्यांना चर्चाच करायची असेल, तर त्यासाठी पंकजाताई, प्रीतमताई किंवा माझी गरज नाही, त्यांना आमचे सुरेश धस हेच पुरेसे आहेत, अशा शब्दात सुरेश धस यांच्याशी चर्चा करुन दाखवण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं.

राष्ट्रवादीने सुरुवातीला संघर्ष यात्रा काढली, पण त्यांच्यात संघर्ष करणारा एकही चेहरा नव्हता. त्यानंतर लोकसभेपूर्वी हल्लाबोल यात्रा काढली, जनतेने त्यांना निकालातून उत्तर दिलं. आता आणखी एक यात्रा काढली आहे. पण जनताच त्यांना पुन्हा एकदा उत्तर देईल. पराभव झाल्यानंतर हे ईव्हीएमला दोष देतात. बारामतीत पवारांची लेक निवडून आली तर ईव्हीएमचा दोष नसतो, पण बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांची लेक निवडून आली तर ईव्हीएमचा दोष असतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

या सभेला मुख्यमंत्र्यांसह बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, शिवाय बीड जिल्ह्यातील युतीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आणण्याचा शब्द दिला.