पुणे पोटनिवडणूक, पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कलाटे यांच्याशी गुरुवारी फोनवरून संवाद साधला होता. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही अर्ज मागे घेण्याची कलाटे यांना विनंती केली. मात्र, कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले.

पुणे पोटनिवडणूक, पिंपरी चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार
पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक
Jitendra Zavar | Updated on: Feb 10, 2023 | 3:39 PM

पुणे : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतला नाही. त्यामुळे तिरंगी लढत होणार आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी आता होणार आहे. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत संभाजी ब्रिगेड व राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जांमुळे महाविकास आघाडीसमोर मोठी अडचण झाली होती. परंतु अजित पवार यांनी संभाजी ब्रिगेडच्या उमेदवारांशी शुक्रवारी चर्चा केली. त्यानंतर सचिन अहिर यांनी या उमेदवारांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांशीही चर्चा केली. या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करून देण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर संभाजी ब्रिगेडने या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.

कलाटे यांचा निर्णय कायम

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कलाटे यांच्याशी गुरुवारी फोनवरून संवाद साधला होता. त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही अर्ज मागे घेण्याची कलाटे यांना विनंती केली. मात्र, कलाटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. संभाजी ब्रिगेडने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु राहुल कलाटे यांनी माघार घेतली नसल्याने महाविकास आघाडीमधील मतांचे विभाजन होणार आहे. त्याचा फायदा भाजपला होणार आहे.

सचिन अहिर यांनी साधला संवाद

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले होते. त्यांनी तब्बल अर्धा तास राहुल कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही.

काय म्हणाले कलाटे

राहुल कलाटे यांनी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले. टीव्ही९ शी बोलताना राहुल कलाटे म्हणाले, की सर्वांनी मला निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. माझी सर्व तयारी पुर्ण झाली आहे. माझ्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवरुन लोक आली आहेत. जनतेच्या भावना मी निवडणूक लढवावी, अशीच होती. त्यामुळे जनभावनेचा आदर करत मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तिरंगी लढत होत असली तरी त्याचा फायदा मलाच होणार असल्याचा दावा राहुल कलाटे यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us