‘नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला’, चंद्रकांत पाटलांचा इशारा

| Updated on: Jan 05, 2022 | 11:29 PM

पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. त्यामुळे मोदींना जवळपास 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून राहावे लागले. त्यानंतर ते आपल्या दौरा रद्द करत पुन्हा दिल्लीला परतले. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

नाना पटोले, नौटंकी करणे तुमचा स्वभाव, मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला, चंद्रकांत पाटलांचा इशारा
नाना पटोले, नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : ‘पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलाय. पंतप्रधान मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. त्यामुळे मोदींना जवळपास 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून राहावे लागले. त्यानंतर ते आपल्या दौरा रद्द करत पुन्हा दिल्लीला परतले. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर वर्षभर निवडणूक लांबवून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत राज्यपालांवर खापर फोडण्याचा त्यांच्या आघाडीचा प्रयत्न म्हणजे नौटंकी होती. नाना पटोलेंच्या राजकीय आयुष्यात नौटंकीचे अनेक प्रसंग आहेत. नौटंकी हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांनी देशातील अत्यंत महत्त्वाच्या संवैधानिक पदावरील व्यक्तीच्या सुरक्षिततेबाबत काँग्रेस सरकारकडून गंभीर चूक झाली असताना त्याला नौंटकी म्हणणे निषेधार्ह आहे. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी नाना पटोले यांनी तोंड सांभाळून बोलावे.

‘मोदींची तुलना राहुल गांधींशी करणे हास्यास्पद’

‘नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेची तूलना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांच्याशी करणे हास्यास्पद आहे. राहुल गांधी अमेठीमध्ये लोकसभा निवडणूक हारलेले आहेत. तर प्रियंका गांधी अद्याप एकाही निवडणुकीत विजयी झालेल्या नाहीत. त्यांच्या सुरक्षेची तूलना देशातील महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेशी करणे असा प्रकार नाना पटोलेच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान असून ते जागतिक नेते आहेत, हे पटोले यांनी तुलना करताना विसरू नये’, असा जोरदार टोलाही पाटील यांनी लगावलाय.

‘नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का?’

तसंच ‘नाना पटोले यांनी पंतप्रधानांविषयी आज घडलेल्या घटनेबाबत बोलताना राहुल गांधी यांच्या गाडीवर झालेल्या कथित हल्ल्याची आठवण करून दिली आहे. अशी आठवण करून देऊन नाना पटोले यांना धमकी द्यायची आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे. आज मोदीजींच्या गाडीवर हल्ला होण्यासाठी पटोले यांच्या पक्षाच्या सरकारने ढिसाळपणा केला का, हे सुद्धा त्यांनी सांगावे’, असं आव्हानही त्यांनी दिलंय.

‘काँग्रेस नेत्यांच्या धमक्यांना भाजपा घाबरत नाही’

पंतप्रधानपदावर असताना इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती त्याचा उल्लेख नाना पटोले यांनी बलिदान असे म्हणत आज केला आहे. पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या जीवघेण्या ढिसाळपणामुळे आज निर्माण झालेल्या परिस्थितीत इंदिराजींच्या हत्येचा उल्लेख करून नाना पटोले यांना काय सुचवायचे आहे, हे ही त्यांनी सांगावे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या धमक्यांना भाजपा घाबरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचे आशीर्वाद मिळालेले आहेत आणि त्या आशिर्वादांचे भक्कम कवच त्यांच्याभोवती आहे, अशा शब्दात पाटील यांनी पटोले यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोलेंटी टीका काय?

दरम्यान नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर खोचक टीका केलीय. ‘जर हेलिकॉप्टरने जायचं होतं तर अचानक सूचना न देता गाडीने का आले? ही सगळी नौटंकी आहे, सहानुभूती मिळवण्यासाठी. शेठ जनतेला सगळं समजतं’, अशा शब्दात पटोले यांनी मोदींवर निशाणा साधलाय.

इतर बातम्या :

Fact Check : मिसेस मुख्यमंत्री RTO कार्यालयातील रांगेत उभ्या! पण आजी की माजी? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

PM Narendra Modi : ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो’, पंतप्रधान मोदींची संतप्त प्रतिक्रिया