Bihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता ‘स्वबळा’ऐवजी ‘आघाडी’चं राजकारण

| Updated on: Sep 24, 2020 | 8:02 PM

बिहारमधील एनडीए सरकारचा पराभव करण्यासाठी राजकीय पक्षांशी आघाडी करुन लढणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar on Bihar Election)

Bihar Election | प्रकाश आंबेडकरांनी रणनीती बदलली; आता स्वबळाऐवजी आघाडीचं राजकारण
Follow us on

मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगातून महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का देणारे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रणनीती बदलली आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याऐवजी आता आघाडी, युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. (Prakash Ambedkar comment on Bihar Election )

वंचित बहुजन आघाडीने राज्यात मोठी ताकद निर्माण केल्यानंतर आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

”बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुका देशाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं आम्हाला वाटतं. सर्व मिळून जर बिहारमधील एनडीएचं सरकार पाडलं तर केंद्रातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं, असं आम्हाला वाटतं. त्यामुळेच आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आंबेडकरांचा आघाडीच्या राजकारणाचा निर्णय केवळ बिहारपुरताच मर्यादित आहे की महाराष्ट्रातही हाच प्रयोग राबवला जाणार आहे? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून राज्यात एमआयएमला सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी समविचारी छोट्या छोट्या पक्षसंघटनांना सोबत घेतलं होतं. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली नव्हती. दोन्ही काँग्रेसने त्यांनी कधीही न जिंकलेल्या लोकसभेच्या 12 जागा वंचितसाठी सोडाव्यात, अशी मागणी आंबेडकरांनी त्यावेळी केली होती. त्यावर मतैक्य न झाल्याने एमआयएमला सोबत घेऊन वंचितने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र, मतांची बेगमी करण्यात ते यशस्वी झाले होते. शिवाय वंचितच्या मदतीमुळे एमआयएमचे इम्तियाज जलील औरंगाबादमधून निवडून आले होते.

विधानसभा निवडणुकीतही जागा वाटपाच्या मुद्द्यावरून वंचितची दोन्ही काँग्रेससोबत युती होऊ शकली नव्हती. जागा वाटपाच्याच मुद्द्यावरून एमआयएम सोबत बिनसल्याने आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. विधानसभेलाही आंबेडकरांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र, यावेळीही ते मतांची बेगमी करण्यात यशस्वी झाले होते. लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत वंचितमुळे दोन्ही काँग्रेसला जोरदार फटका बसला होता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी आता बिहारमध्येही राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, हा प्रयत्न करताना त्यांनी आघाडीचं राजकारण करण्याचा निर्णय घेतला असून लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष त्यांना कसा प्रतिसाद देतो हे पाहणं औत्स्युक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

‘वंचित बहुजन आघाडीने हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला का?’ प्रकाश आंबेडकर म्हणतात…

VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग

(Prakash Ambedkar comment on Bihar Election )